कुर्डुवाडीत मोकाट श्वानांचा हैदोस:ड्यूटीवर जाणाऱ्या रेल्वेच्या अधिकाऱ्यावर हिंस्त्र हल्ला, रेल्वे जंक्शन बनले श्वानांचे आगार

रात्रपाळीच्या कर्तव्यावर जाणाऱ्या एका रेल्वे कर्मचाऱ्याला मोकाट श्वानांच्या टोळीने लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना कुर्डुवाडी रेल्वे स्थानक परिसरात घडली. श्वानांच्या अचानक झालेल्या हिंस्र हल्ल्यामुळे दुचाकीवरून कोसळून रेल्वेचे ट्रेन मॅनेजर प्रभाकर पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न कमालीचा ऐरणीवर आला असून, रेल्वे कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रेल्वेत ट्रेन मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले प्रभाकर पाटील हे नेहमीप्रमाणे दि. ८ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून रेल्वे स्थानकाकडे ड्युटीसाठी निघाले होते. ते भाजी मंडई रेल्वे स्थानक परिसरात आले असता, अचानक १० ते १२ भटक्या श्वानांच्या टोळीने त्यांच्या दुचाकीचा जोरात पाठलाग सुरू केला. काही समजण्याच्या आतच एका श्वानांने थेट त्यांच्या पायाला पकडले. यामुळे पाटील यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते रस्त्यावर जोरदार आदळले. या भीषण अपघातात त्यांच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. भटक्या श्वानांच्या या वाढत्या उपद्रवाबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाद्वारे श्वानांचा योग्य बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या गंभीर इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या याच हलगर्जीपणामुळे आज ही दुर्घटना घडल्याचा थेट आरोप रेल्वे कर्मचाऱ्यांमधून होत आहे. मागील महिन्यात झालेल्या कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत श्वान नसबंदीचा विषय उपस्थित झाला होता. सभागृहाने या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला मंजुरीही दिली, मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. रेल्वे जंक्शन बनले श्वानांचे आगार कुर्डुवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे जंक्शन असल्याने येथे दिवस-रात्र प्रवाशांची आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी असते. रेल्वे स्थानकाच्या बाहेरच मोठी भाजी मंडई व चिकन, मासे विक्रेत्यांचे स्टॉल्स आहेत. या स्टॉल्सवरील टाकून दिलेल्या उष्ट्या-खरकट्या अन्नामुळे या परिसरात मोकाट श्वान कायम फिरत असतात. नगरपरिषदेची मंजुरी कागदावरच शहरात दिवसा मोकाट भटके जनावरे रस्त्यावर फिरतात, तर रात्री श्वान लोकांवर हल्ले करतात. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचा पाठलाग केल्यामुळे येथे अनेकदा अपघात झाले आहेत. लहान मुलांना घराबाहेर पडणेही आता धोकादायक झाले आहे. हा प्रश्न गेल्या पाच-सहा वर्षांपासून अनुत्तरीत आहे. या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी आणि कुर्डुवाडीकरांमध्ये प्रचंड संताप आहे. आतातरी नगरपरिषद प्रशासनाला जाग येणार का? आणि निष्पाप नागरिकांचा जीव घेणाऱ्या या मोकाट श्वानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला जाणार का?, असा संतप्त सवाल आता शहरातील नागरिक विचारत आहेत. श्वांनाच्या प्रश्नी टेंडर प्रोसेस झाली भटक्या मोकाट श्वांनाच्या प्रश्नी टेंडर प्रोसेस झालेली आहे. आचारसंहितेमुळे वर्क ऑर्डर देता आली नाही. आचारसहिंता संपताच वर्क ऑर्डर देतोय. त्यानंतर भटक्या मोकाट श्वांनाना पकडून निर्बिजीकरणाचे काम केले जाईल. सचिन तपसे, मुख्याधिकारी नगरपालिका, कुर्डुवाडी

Leave a Comment

error: Content is protected !!