Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

आचार्य नयन पद्मसागरांकडून वादग्रस्त विधान:महाराणी ताराराणी जैन असल्याचा केला उल्लेख; मराठीची रचनाही जैन आचार्यने केल्याचा दावा

मुंबईत आयोजित जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी ‘स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या’ असे विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. यावरून आता सामाजिक तसेच राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावीर जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आचार्य नयन पद्मसगर म्हणाले, मोहम्मद घोरीने देशावर आक्रमण केले त्यावेळी जैन असलेल्या मेवाड राणीने आपली तलवार काढली. त्यानंतर पुढील अनेक वर्षे आपल्या देशावर कोणी नजर वर करून बघायची हिंमत केली नाही. संस्कार आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हातात तलवार घेणे याला धर्म म्हणतात. विक्रमादित्यने पूर्ण भारताला स्वतंत्र करण्यात मदत केली. औरंगजेब याने संभाजी महाराजांना पकडून हाल केले. त्यावेळी आणखी एक जैन महाराणीचा जन्म झाला आणि ती म्हणजे ताराराणी, असे विधान पद्मसागर यांनी केले आहे. मराठीची रचना जैन आचार्यने केली पुढे बोलताना तर आचार्य नयन पद्मसगर यांनी मराठीची रचना सुद्धा जैनांनी केली असे म्हटले आहे. ते म्हणाले, एकट्या महाराष्ट्रात 1 कोटी 12 लाख जैन आहेत. मराठी भाषेची रचना जैन आचार्यने केली आहे. तसेच संपूर्ण भारतात जेवढे खरे मराठी जर कोणी आहेत, तर ते सगळे जैन आहेत. जेवढे पाटील आहेत, पाटील कोणता धर्म पाळतात जैन धर्म. पाटील बघा, चौघुले, सरनाईक हे सगळे जैन आहेत. महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना जैनने सुरू केली आहे. तसेच पहिला फिल्म स्टुडिओ जैनने सुरू केल्याचा दावा त्यांनी केला आहे. महाराणी ताराराणी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि राजाराम महाराजांच्या पत्नी असलेल्या महाराणी ताराराणींनी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी वैधव्य येऊनही अत्यंत खंबीरपणे मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. मुघलांसह स्वराज्याच्या अनेक अंतर्गत आणि बाह्य हितशत्रूंचा धडाडीने प्रतिकार करत त्यांनी अनेक लढाया आणि बंडांना तोंड दिले. पतीच्या निधनानंतर तब्बल 61 वर्षे मराठा साम्राज्यातील राजकीय स्थित्यंतरांचे साक्षीदार राहत त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि मुत्सद्दीपणाने स्वराज्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात अतुलनीय योगदान दिले. राजाराम महाराजांच्या निधनानंतरमहाराणी ताराबाई बिकट परिस्थितीतही डगमगून न जाता 1701 मध्ये त्यांनी पन्हाळा येथे पुत्राचा राज्याभिषेक करवून घेत स्वराज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. औरंगजेब एकामागून एक किल्ले हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असताना ताराबाईंनी रामचंद्रपंत अमात्य, परशुरामपंत प्रतिनिधी आणि सेनापती धनाजी जाधव यांच्या मोलाच्या सहकार्याने स्वराज्याचे समर्थपणे रक्षण केले आणि सिंहगड, राजगड, पन्हाळा, पावनगड, वसंतगड व सातारा यांसारखे महत्त्वाचे किल्ले मुघलांकडून पुन्हा जिंकून घेण्याची पराक्रमी कामगिरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि शिवरायांची सून म्हणून त्यांनी जो पराक्रम गाजवला आहे तो मराठी माणसाच्या मनातून कधीच पुसला जाऊ शकणार नाही. ताराराणी यांच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या ओळी: दिल्ली झाली दीनवाणी / दिल्लीशाचे गेले पाणी // ताराबाई रामराणी / भद्रकाली कोपली // ताराबाईच्या बखते / दिल्लीपतीची तखते / खचो लागली तेवि मते / कुराणेही खंडली // रामराणी भद्रकाली / रणरंगी कृद्ध झाली // प्रलयाची वेळ आली / मुगलहो सांभाळा //

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!