सोलापूर शहरातील महापालिकेच्या ७ प्रसूतिगृहांमधील २८३ बाळंतीण गेल्या अडीच महिन्यांपासून मोफत अन्नापासून वंचित आहेत. इतकेच नव्हे, औषधे आणि सलाइनचीदेखील वानवा आहे. नातेवाइक बाहेरच्या मेडिकलमधून खरेदी करताना दिसून येतात. प्रसूतीसाठी दाखल होऊन डिस्चार्ज मिळेपर्यंत मातांना सकस आहार देण्याची योजना मनपा अधिकाऱ्यांनी गुंडाळून ठेवल्यासारखी स्थिती आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याचे कारण हास्यस्पद दिले. काढलेल्या निविदेला प्रतिसाद नसल्याने मोफत अन्न नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह (डफरीन), दाराशा, भावनाऋषी, जिजामाता, चाकोते, रामवाडी आणि साबळे अशी एकूण ७ प्रसूतिगृहे आहेत. पैकी डफरीन आणि दाराशा ही प्रसूतीगृहे अद्ययावत असून तिथे सर्व सुविधा देण्यात आल्या. शासनाच्या नियमानुसार प्रसूतिगृहात दाखल सर्वांना सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण मोफत दिले जाते. मात्र, गेल्या मार्च महिन्यानंतर हे मोफत जेवण पूर्णपणे बंद झाले. प्रसूतिनंतर मातेच्या शरीरात अनेक बदल होतात. हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी, उर्जेची पातळी वाढवण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी, केस गळती थांबवण्यासाठी आहार महत्वाचा असतो. त्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असतो. परंतु त्याशिवाय अन्न दिले जाते. त्याच्या दर्जेवर कोणाचेही नियंत्रण नसते. केवळ १०० रुपये दराने ताट देण्याची निविदा मंजूर करण्यात येते. पौष्टिक पदार्थांची कशी अपेक्षा करता येईल? असा प्रश्न एका मक्तेदाराने उपस्थित केला. निविदेला प्रतिसाद नसण्यामागे दराचेही कारण आहे.
निविदेला प्रतिसाद का नाही? मार्च २०२५ मध्ये निविदेची मुदत संपली. त्यानंतर मनपा प्रशासनाने दोन वेळा निविदा काढली. त्याला प्रतिसाद नाही. त्यानंतर महापालिका निवडणूक लागली. त्यामुळे दुर्लक्ष झाले. मार्चपर्यंत सेवा दिलेल्या संजना महिला बचत गटाची मक्ता संपली. ऑगस्ट २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंतचे साडेपाच लाख रुपये बिल थकले. त्याची पूर्तता नाही. निविदेला प्रतिसाद नाही. घरातूनच जेवणाचा डबा घेऊन येतो दाराशा प्रसूतिगृहात माझ्या पत्नीची प्रसूती होऊन दोन दिवस झाले. पूर्वी प्रसूती झालेल्या बाळंतीणीला मोफत जेवण दिले जात होते. आता मिळत नाही. त्यासाठी आम्ही घरातूनच जेवणाचा डबा घेऊन जातो. घरात स्वयंपाक करणारे कोणी नसल्याने त्रास होत आहे. इरफान शेख याकडे दुर्लक्ष…. दूध वाढवण्यासाठी आणि आईच्या शरीराच्या पुनर्प्राप्तीसाठी डाळी, कडधान्ये, अंडी, मासे, चिकन, आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असावा. त्याचा अभाव काय काय असते मातांच्या जेवणात सकाळी नाष्टा : पोहे, उप्पीट आणि कपभर दूध दुपारचे जेवण : दोन पोळी, सुकी भाजी, भात रात्रीचे जेवण : दोन पोळी, एक सुकी भाजी, भात दर बुधवारी : दिवसभरात एक अंडी देण्यात येते. आचारसंहिता संपल्यावर जेवण देऊ आचारसंहितेच्या कारणामुळे निविदा प्रक्रिया थांबली. आचारसंहिता संपताच सभागृहाची मान्यता घेऊन लवकरच औषधसाठा आणला जाईल. मोफत जेवण दिले जाईल. पूर्वीच्याच मक्तेदाराला सांगून पुन्हा मोफत जेवण देऊ. डॉ. राखी माने, आरोग्य अधिकारी, महापालिका
