भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे. कोविड काळात संजय राऊत यांनी मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असे सांगत त्यांनी राऊतांवर आरोपांचा भडिमार केला. नवनाथ बन म्हणाले की, त्या काळात संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याविरोधात किती अपशब्द वापरले, सामना अग्रलेखातून कशी टीका केली, हे जनतेने प्रत्यक्ष पाहिले आहे. आज मात्र पुतणा–मावशीचे प्रेम अचानक उफाळून आले आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. त्याच दिवशी राजीव गांधींचा शपथविधी नवनाथ बन म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ज्या दिवशी अंत्यसंस्कार झाले त्याच दिवशी राजीव गांधी यांचा शपथविधी पार पडला होता. घटनेनुसार आणि वेळेनुसार निर्णय घ्यावे लागतात. एखादे घटनात्मक पद रिक्त झाल्यानंतर ते तात्काळ भरणे आवश्यक असते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंब जो निर्णय घेईल, त्या निर्णयामागे भाजप पूर्णपणे पाठिशी उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ..तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही संजय राऊतांवर आणखी टीका करताना नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाचे खासदार राऊत यांनी आज पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. त्यांना बारशाचे मंत्र कधीच शिकवलेले नाहीत, फक्त बाराव्याचे मंत्रच शिकवलेले आहेत. अपप्रचार करणे हाच त्यांचा धंदा आहे, असा घणाघात त्यांनी केला. दिवंगत अजित पवार यांच्याबद्दल आज राऊत जे प्रेम दाखवत आहेत, ते बनावट आणि राजकीय सोयीचे असून ते पुतणा–मावशीचे प्रेम असल्याचा टोला बन यांनी लगावला. यापूर्वी अजित पवारांबद्दल तुम्ही काय काय बोललात ते जर दाखवले, तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असेही त्यांनी सुनावले. त्याला भाजप पूर्ण पाठिंबा नवनाथ बन म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यायचा आहे. यासाठी त्यांच्या पक्षाची बैठक होईल. हा पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. यात अमित शहा यांचे नाव घेण्याचे काहीही कारण नाही, असे सांगत बन यांनी राऊतांवर नकारात्मक राजकारणाचा आरोप केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस जो काही निर्णय घेईल, त्याला भाजप पूर्ण पाठिंबा देईल. त्यामुळे संजय राऊत यांनी यावर बोलणे टाळलेलेच बरे, असा सल्लाही नवनाथ बन यांनी दिला.
