वैज्ञानिक पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत विश्वासार्ह:पोलिसांना तपासाचे धडे, बदलत्या गुन्ह्याच्या स्वरुपानुसार तपासाची पद्धत अपग्रेड‎

गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी, पोलिस विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अलीकडे गुन्ह्यांचे स्वरुप बदलले आहेत. इंटरनेट, मोबाईल, सोशल मिडीया, डिजीटल व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज या सर्व बाबींचे तपासात महत्व वाढले आहे. तसेच अशा गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेत वैज्ञानिक पुरावे विश्वासार्ह मानले जातात, त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना विशेष फॉरेन्सिकचे धडे देण्यात आले आहे. जेणेकरुन अशा ‘अपग्रेड’ ज्ञानाचा वापर तपासात प्रत्यक्षात पोलिसांना करता येणार आहे. शहरातील विद्याभारती महाविद्यालयाच्या परिसरात २१ मे रोजी ग्रामिण पोलीस विभागाच्यावतीने एका विशेष ‘फॉरेन्सिक कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. आधुनिक काळातील गुन्ह्यांचे बदलते स्वरूप पाहता, पोलिसांचे तंत्रज्ञानविषयक कौशल्य वाढवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेत अमरावती ग्रामीण, वाशिम, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांतील तब्बल २६० वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच, नव्याने कार्यरत करण्यात आलेल्या ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’च्या तज्ज्ञांनीही यात सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या विविध विभागांमार्फत तपासातील तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये डीएनए विश्लेषण, बॅलिस्टिक, नार्कोटिक्स, केमिकल ॲनालिसिस आणि दस्तऐवज परीक्षणाबाबत माहिती देण्यात आली. ही कार्यशाळा अमरावती परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबईचे संचालक डॉ. विजय ठाकरे, सायबर फॉरेन्सिक विभागाचे सहाय्यक संचालक निलेश पाटील, अमरावती प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या उपसंचालक वैशाली महाजन आणि विद्याभारती फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्रीकांत पांढे प्रामुख्याने उपस्थित होते. पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले. या कार्यशाळेमुळे आगामी काळात अमरावती परिक्षेत्रातील गुन्हे तपासाच्या पध्दतीत मोठी सुधारणा दिसून येणार असून, गुन्हेगारांना चाप लावणे अधिक सोपे होणार आहे. डिजिटल पुराव्यांचे महत्त्व अलीकडे मोबाईल, सोशल मीडिया, सीसीटीव्ही फुटेज, ईमेल आणि आयपी लॉग्स हे गुन्ह्यातील सर्वात महत्त्वाचे पुरावे ठरत आहेत. त्यामुळे सायबर फॉरेन्सिकच्या साहाय्याने या डिजिटल पुराव्यांचे संकलन, जतन आणि विश्लेषण करणे पोलिसांसाठी अनिवार्य झाले आहे, असे तज्ज्ञांनी यावेळी अधोरेखित केले.

Leave a Comment

error: Content is protected !!