मोर्शीतील अर्धवट पुलासाठी आता ‘करो या मरो’चा इशारा:काँग्रेसने घेतली आक्रमक भूमिका, प्रशासनाला पूर्वकल्पना‎

येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम येत्या पाच ते सात दिवसात सुरू करण्यात यावे अन्यथा आता ‘करो या मरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे मोर्शी-वरुड विधानसभा प्रमुख श्रणित राऊत यांनी या आशयाचे एक लेखी निवेदन आज, गुरुवारी मोर्शीच्या उपविभागीय अधिकारी यांना सादर करीत प्रशासनाला या आंदोलनाची पूर्वकल्पना दिली आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा या रस्त्याचे बांधकाम जवळपास चार ते पाच वर्षापासून पूर्णत्वास गेले असूनसुद्धा येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम रखडले आहे. परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.नांदगाव पेठ ते पांढुर्णा हा मुख्य महामार्ग असून दुतर्फा असलेला हा पूल एका बाजूने पूर्ण करण्यात आलेला आहे. परंतु दुसऱ्या बाजूने तो अर्धवट अवस्थेत पडून आहे. या पुलालगतच तीर्थक्षेत्र सालबर्डी येथे जाणारा मार्ग असल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांची नेहमी कोंडी होते. वरूडवरून अमरावतीकडे जाणाऱ्या वाहनांना हा अर्धवट पूल दिसत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी वरुडवरुन अमरावती येथे धान्य घेऊन जाणारा आयशर ट्रक नदी काठावर असलेल्या खड्यात उलटला होता. सुदैवाने कोणत्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही.परंतु मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली होती. वरुड-मोर्शी मार्गे चांदूरबाजार जाणारी कारही त्याच ठिकाणी उलटली होती. मुळात वरुडवरुन येणाऱ्या वाहनाच्या चालकांना दुसऱ्या बाजूने येणारे वाहन अजिबात दिसत नाही. परिणामी या ठिकाणी वारंवार अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. तीर्थक्षेत्र सालबर्डी येथे बाराही महिने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते येथूनच सालबर्डी जाणारा वळण रस्ता असल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. नळा नदीवरील अर्धवट पुल हा संपूर्ण मोर्शीकरांना नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांना वेळोवेळी मरणाला आमंत्रण देत आहे. निवेदन देतेवेळी श्रणित राऊत यांच्यासह शहर अध्यक्ष नगरसेवक भूषणभाऊ कोकाटे, चंदुभाऊ जवंजाळ, सामाजिक कार्यकर्ते अमरभाऊ कदम, कमल बरडे, प्रवीण खेरडे, गजानन चरपे, आशिष ठाकरे, राहुल ठाकरे, नितेश गोडबोले, अंकुश तेटू, चंदन राऊत, सर्वेश वानखडे, पुष्पक दुगाने, हरिओम उमक्, तेजस खवले, प्रथमेश गायकवाड, प्रज्वल गाडबैल आदी उपस्थित होते. लढाईसाठी सज्ज कित्येक वेळा विविध सामाजिक संघटनांच्यावतीने या ठिकाणी पुलावर बसून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. वर्धेचे खासदार अमर काळे आणि माजी पालकमंत्री यशोमती ठाकूरही वेळोवेळी झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्या आंदोलनावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अभियंत्यांनी अवघ्या आठ दिवसात पुलाचे बांधकाम सुरु होईल, असे म्हटले होते. परंतु अजूनही पुलाचे बांधकाम सुरु झाले नाही. त्यामुळेच आता आरपारच्या लढाईसाठी काँग्रेस सज्ज झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!