चिखलदरा तालुक्यातील ग्राम सावऱ्या येथील गावकऱ्यांनी सामाजिक एकतेचा आदर्श घालून देत सार्वजनिक हँडपंपामधील सांडपाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी श्रमदानातून जलतारा उभारण्याचे कार्य केले. गावातील सार्वजनिक हँडपंप परिसरात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत हा उपक्रम राबविला. कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता गावातील महिला व पुरुषांनी एकत्र येत श्रमदान करून हे काम पूर्ण केले. या सामाजिक कार्यात नंदलाल कास्डेकर, रुपराव शेळके, चंद्रभान पाटील यांच्यासह गावातील अनेक नागरिक, महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांच्या सहकार्यामुळे हे काम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. गावाच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने ग्रामस्थांनी घेतलेला हा पुढाकार इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सामूहिक प्रयत्नातून गावाचा विकास साधता येतो. याचे उत्तम उदाहरण सावऱ्या ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. हँडपंपाचे पाणी इतरत्र विखरून एकतर चिखल व्हायचा किंवा ते वाया जायचे. यामुळे पाणी भरण्यासाठी येणाऱ्यांना डासांचाही त्रास व्हायचा. चिखल अंगावर उडून कपडे खराब व्हायचे. याबाबत शासकीय मदतीसाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु त्यामुळे कोणताही फायदा झाला नाही. अखेर गावकऱ्यांनीच पुढाकार घेत ही समस्या निकाली काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी स्वतःकडे असलेली अवजारे आणून प्रत्यक्ष काम सुरू केले. केवळ काही तासांत जलतारा तयार करण्यात आला. त्यामुळे हँडपंपातून टपकणारे किंवा गळणारे पाणी आता या जलतारात जाऊन पडते. ते वाया जात नाही. पाणी जमिनीतच मुरावे हा उद्देश चिखलदरा तालुक्यात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. उन्हाळ्यात येथे सहज पाणी मिळत नाही. टँकरच्या भरवशावर दिवस काढावे लागतात. हँडपंपाचे पाणीही महत्प्रयासाने मिळते. त्यामुळे पाणी भरताना जे अतिरिक्त पाणी बाहेर पडते ते तसेच सुकायचे. ते पाणी जमिनीत मुरावे यासाठी सावऱ्या येथील गावकऱ्यांनी जलतारा, अर्थात शोषखड्डा, तयार केला. त्यामुळे आता अतिरिक्त पाणी तसेच पडून न राहता किंवा सुकता ते या जलतारात पडेल. त्यामुळे निश्चितच हँडपंपाच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल, असे आदिवासी गावकऱ्यांनी सांगितले.
