शेतकऱ्यांचे प्रशिक्षणातून प्रबोधन
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मारेगाव तालुक्यातील सराटी येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणात सराटी व कान्हाळगाव येथील राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान क्लस्टरमधील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
सराटी येथील नैसर्गिक शेती करणारे शेतकरी सुभाष ढेंगळे यांच्या शेतात हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. मंडळ कृषी अधिकारी किशोर डोंगरकार यांनी जमिनीच्या आरोग्यावर रासायनिक शेतीचे होणारे परिणाम व सेंद्रिय कर्बाचे महत्त्व स्पष्ट केले.

कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, नैसर्गिक निविष्ठा, वनस्पतीजन्य कीटकनाशके यांची माहिती दिली. तसेच बिजामृत, जिवामृत, आच्छादन व वापसा या नैसर्गिक शेतीच्या मूलतत्त्वांवर शेतकऱ्यांचे प्रबोधन केले.
ज्येष्ठ शिक्षक शेषराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वृंद मानकर सर व अढाऊ सर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षणस्थळी मनोज ढेंगळे यांच्या गांडूळखत, दशपर्णी अर्क, जिवामृत, अमृतपाणी, जैविक पोटॅश आदी नैसर्गिक उत्पादने निर्मिती प्रकल्पाला भेट देण्यात आली. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसन्न पारस्कर यांनी नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन व संचालन प्रसन्न पारस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपकृषी अधिकारी विनायक जुमनाके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक कृषी अधिकारी निखिल पवार, सनथ घोसळकर, उदय नायक, समूह सहाय्यक श्यामल राऊत तसेच कृषी सखी हर्षा ढेंगळे, दिपाली लालसरे, आचल कुचराम, मनीषा टोंगे, सपना मिलमिले व सोनाली एलके यांनी परिश्रम घेतले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास परिसरातील शेतकरी तसेच गावातील माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
