तालुक्यातील मोर्विस येथील उपबाजार समितीत आज शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक बाजार भरवून सत्ताधारी कोल्हे गटाच्या निष्क्रियतेकडे लक्ष वेधले. भाड्याने जागा घेऊन सव्वा वर्ष लोटले, तरी अद्याप शेतमालाचे लिलाव का सुरू झाले नाहीत?” असा सवाल विचारत शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनाची सध्या कोपरगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. मोर्विस येथील या आंदोलनात शेतकऱ्यांनी सर्वप्रथम सत्यनारायण पूजा केली. त्यानंतर कांद्याचे प्रतिकात्मक लिलाव करून उत्पादकांना टोकन देण्यात आले. मोर्विससह सांगवी भुसार, धामोरी, मायगाव देवी, चास नळी, वडगाव, बक्तरपूर, मंजूर, आणि हंडेवाडी आदी गावांतील शेतकरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपबाजार समितीसाठी जागा भाडेतत्त्वावर घेऊन सव्वा वर्ष उलटून गेले आहे. मात्र, सत्ताधारी कोल्हे गटाने अद्याप येथे लिलाव प्रक्रिया सुरू केलेली नाही. यामुळे जागेपोटी दिलेले भाड्याचे पैसे तर वाया गेलेच, शिवाय शेतकऱ्यांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोर्विस परिसरातील शेतकऱ्यांना सध्या आपला शेतमाल विकण्यासाठी २० किमी अंतरावर असलेल्या कोपरगाव मुख्य बाजार समितीत यावे लागते. यामुळे वाहतूक खर्च आणि वेळ वाया जात असून, या उपबाजाराची अवस्था ‘असुन अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. जर वेळेत लिलाव सुरू झाले असते, तर स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती झाली असती आणि शेतकऱ्यांचा फायदा झाला असता, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. दुसरीकडे, माजी आमदार अशोकराव काळे यांनी पश्चिम भागाला शहराशी जोडणारा धारणगाव-कुंभारी पूल उभारला, तर आमदार आशुतोष काळे यांनी मंजूर बंधाऱ्याचे काम सुरू केले. सध्या देर्डे फाटा ते मोर्विस रस्त्याचे काँक्रिटीकरणही वेगात सुरू आहे. त्यामुळे विकासकामांची ही परंपरा पाहता, आता आमदार आशुतोष काळे यांनीच या विषयात वैयक्तिक लक्ष घालून मोर्विस उपबाजार समितीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. पश्चिम भागावर नेहमीच अन्याय आंदोलक शेतकऱ्यांनी आरोप केला की, कोल्हे गटाने नेहमीच कोपरगाव मतदारसंघातील पश्चिम भागावर अन्याय केला आहे. मंजूर बंधारा असो की पश्चिम भागाला जोडणारा धारणगाव-कुंभारी पूल, त्यांनी या भागातील समस्या कधीही गांभीर्याने सोडवल्या नाहीत. राज्य मार्ग ७ च्या कामाबाबतही असाच संथ आणि निराशाजनक अनुभव आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
