उसनवारीच्या त्रासातून तरुणाची आत्महत्या:तिघांना अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी‎

तालुक्यातील निवडुंगे येथील बाळासाहेब कुंडलिक ढवळे (वय ३५) यांना भिशी आणि उसनवारीच्या पैशांवरून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी तिघा आरोपींना तातडीने अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींची सुरुवातीला २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती, ज्याची मुदत संपल्यानंतर आता आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. याप्रकरणी आबिद आसिब शेख (वय ५५), नईम अस्लम ऊर्फ बब्बूभाई शेख (वय ३०) आणि रफिक ऊर्फ कालू अस्लम ऊर्फ बब्बूभाई शेख (वय २७, सर्व रा. निवडुंगे, ता. पाथर्डी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, मयत बाळासाहेब ढवळे यांनी एक भिशी सुरू केली होती. या भिशीचे सदस्य असलेल्या तिन्ही आरोपींनी भिशीचे पैसे उचलल्यानंतर ते परत भरण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी भिशीतील इतर सदस्यांनाही पैसे भरण्यापासून परावृत्त करून बाळासाहेब यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, बाळासाहेब ढवळे यांनी आरोपी नईम शेख याला हॉटेल व्यवसायासाठी सुमारे सात लाख रुपये उसनवारी म्हणून दिले होते. हे पैसे जेव्हा बाळासाहेब यांनी परत मागितले, तेव्हा आरोपींनी ते देण्यास साफ नकार दिला. या आर्थिक कोंडीमुळे आणि आरोपींकडून सातत्याने मिळणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून बाळासाहेब ढवळे यांनी १६ जून रोजी रात्री विषारी औषध प्राशन केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना, दुर्दैवाने १७ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मयताचे भाऊ महेश कुंडलिक ढवळे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून आरोपींचा शोध सुरू केला आणि १९ जून रोजी पहाटेच तिन्ही आरोपींना अटक केली.

Leave a Comment

error: Content is protected !!