मंगळवेढा बायपासवरील खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत. या मार्गावरून वाहन चालवणे म्हणजे कसरत असल्याचे चालक बोलत आहेत. रस्त्याच्या बाजूला राहणारे लोक धुळीने बेजार झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी भाजप शहराध्यक्षांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले होते. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. प्रशासनावर काहीच फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे. निवेदन दिल्यानंतर महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी खड्ड्यांची डागडुजी सुरू केली असली तरी तिचा दर्जा चांगला नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवेढ्यातील बायपास रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. भाजप शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून संबंधित विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मंगळवेढा बायपास हा सोलापूर, पंढरपूर, सांगोला तसेच कर्नाटकाकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो. दररोज शेकडो अवजड वाहने, मालवाहू ट्रक, बस तसेच चारचाकी आणि दुचाकी वाहनांची या मार्गावरून वर्दळ असते. मात्र रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याचे काम करणारा ठेकेदार डांबर उपलब्ध नसल्याचे कारण सांगत असल्यामुळे ,डांबर उपलब्ध झाल्यानंतर काम करण्यात येईल असे सांगत आहे, आम्ही कार्यालयाच्या वतीने वारंवार लेखी व तोंडी सूचना दिलेले आहेत, तरी अजून याविषयी पाठपुरावा करून लवकरात लवकर काम करून घेण्याविषयी प्रयत्न करीत आहोत. रितेश पाटील, शाखा अभियंता राष्ट्रीय महामार्ग सोलापूर भाजपाचे शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी अधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन सोशल मीडिया तीव्र भावना व्यक्त केली आहे. सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी याबाबत प्रश्न मांडूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने समाज माध्यमात तीव्र भावना व्यक्त करत आहेत. पुढच्या पंचवार्षिकमध्येच काम होणार आहे का..? वारंवार निवेदने देऊनही खड्डे बुजवले नाहीत. मागच्या एप्रिल महिन्यात निवेदन देऊनही प्रशासन मंगळवेढा बाह्यवळण रस्त्याबाबत ढिम्म आहे. या विषयावर वारंवार निवेदन, फोन कॉल करून ही अधिकारी ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. ह्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा विचार प्रशासनाने बहुधा पुढच्या पंचवार्षिक योजनेसाठी राखून ठेवला असावा. नागेश डोंगरे , शहराध्यक्ष, भाजप, मंगळवेढा सर्व खड्डे तातडीने बुजवावेत पावसाळ्यापूर्वी नियमित देखभाल करावी.अपघातप्रवण ठिकाणी इशारा फलक लावावेत. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही करावी.
