राज्यात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. बहुतांश भागात हवामान कोरडे आणि उष्ण राहिले आहे. किनारपट्टीच्या भागात दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवत आहे. काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता असून 13 आणि 14 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर यांसह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या पावसाची कोणतीही शक्यता नसली तरी उकाडा आणि उष्णतेची लाट काही भागांमध्ये जाणवू शकते. तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे. आज हवामान कोरडे राहणार असले तरी 14 मार्चपासून काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे वेधशाळा येथील हवामानतज्ज्ञ सखाराम सानप यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे, पाणी आणि द्रवपदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सध्या राज्यातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर पुण्यात आज सुमारे 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. मुंबईसह समुद्रकिनारी भागातही तापमानात वाढ झाली आहे. काही ठिकाणी पहाटेच्या वेळी प्रदूषणामुळे धुक्यासारखा थर दिसून येत आहे. मात्र यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान विदर्भातील काही भागांमध्ये तापमान 40 अंशांच्या आसपास पोहोचले आहे. पुढील दोन दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 14 मार्चनंतर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या सरी सध्या गुजरात आणि महाराष्ट्र या परिसरात प्रतिचक्रवर्ती परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असून तापमान वाढले आहे. मात्र संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट नसून काही भागांमध्येच तिचा परिणाम दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 मार्चनंतर विदर्भ आणि मराठवाडा भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील हवामानात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
