प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र शासनाकडून २०२४ वर्षासाठीचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात जिल्ह्याने दुहेरी बहुमान पटकावला आहे. पातूर तालुक्यातील विवरा येथील शेतकरी वंदना देविदास धोत्रे यांना ‘जिजामाता कृषिभूषण पुरस्कार’ तर दिग्रस बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र महादेव ताले यांना सेंद्रिय शेतीसाठीचा ‘कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार विजेत्या वंदना धोत्रे यांनी दोन एकरात १००% सेंद्रिय शेती फुलवली आहे. वंदना धोत्रे यांना सेंद्रिय शेतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जिजामाता कृषिभूषण’ पुरस्कार जाहीर झाला. दोन लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या १ जुलै रोजी मुंबईत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडणार आहे. वंदना धोत्रे यांच्याकडे चार एकर शेती असून, त्यापैकी दोन एकरावर त्यांनी सेंद्रिय पद्धतीने विविध भाजीपाल्यांचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. शेतातील झाडपाला, कंपोस्ट खत, गोमूत्र आणि घरीच तयार केलेले ‘जीवामृत’ वापरुन नैसर्गिक शेती फुलवली आहे. त्यांच्या या प्रयोगाची कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून दखल घेतली होती. यापूर्वी विदर्भातील उत्कृष्ट महिला शेतकरी म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेनेही त्यांचा सन्मान केला आहे. राजेंद्र ताले यांना सेंद्रिय शेतीतील उत्कृष्ट योगदानासाठी ‘कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेता स्वतःच्या कष्टावर त्यांनी सेंद्रिय शेतीचा हा आदर्श पॅटर्न उभा केला आहे. ताले हे १९९९ पासून म्हणजेच गत २५ वर्षांपासून १०० टक्के सेंद्रिय शेती करत आहेत. पिकांच्या वाढीसाठी व कीड नियंत्रणासाठी ते लसूण, मिरची, तंबाखू, गूळ, अंडी, ताक आणि मोड आलेल्या धान्यांचा वापर करून स्वतःच सेंद्रिय कीटकनाशके व जीवामृत तयार करतात. त्यांच्या साडेसहा एकर शेतीत ते दरवर्षी केळी, पपई, कापूस, हळद यांसह ३० ते ३५ प्रकारची पिके घेतात. त्यांनी स्वतः केळी व पपईची नवी जात विकसित केली आहे. एका एकरात साडेआठ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे.
