“श्री गजानन-जय गजानन’, “गण गण गणात बोते’चा जयघोष करत पारंपरिक वाद्य, टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेला संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी संध्याकाळी भौरद येथे पोहोचला. भौरद येथे मुक्कामी असलेली श्रींची पालखी बुधवारी सकाळी ११ वाजता डाबकी रोडवरील खंडेलवाल महाविद्यालयात पोहोचणार आहे. यानंतर दोन दिवस राजराजेश्वर नगरीत फक्त “माऊली’चा गजर कानी पडणार आहे. भाविकांमध्ये माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. ठिकठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आली आहे. यंदा श्रींच्या पालखीचे ५७ वे वर्ष आहे. श्रींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान रविवारी सकाळी शेगाव येथून झाले. पारंपरिक बँड व टाळ-मृदंगाच्या गजरात श्रींचा अश्व, श्रींची पालखी, पालखीत सहभागी झालेल्या सुमारे ७०० वारकऱ्यांचा ताफा पायी निघाला. वारी भक्तीपूर्ण आणि मंगलमय वातावरणात नागझरी मार्गाने पारस येथे मुक्कामी पोहोचली. मंगळवारी सकाळी निमकर्दा, गायगावमार्गे दिंडी भौरद येथे दुपारी दाखल झाली. पायी वारी अकोल्यात दाखल होणार असल्याने मंगळवारी भौरदच्या पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले.पालखीचा अकोल्यातील पहिल्या दिवशीचा मुक्काम मुंगीलाल उर्वरित पान ४ महापौरांनी घेतला आढावा पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी महापौर शारदा खेडकर यांनी मनपाच्या विभागांचा आढावा घेतला. पालखी मार्गावरील स्वच्छता, रस्त्यांची स्थिती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना, रात्रीच्या वेळी पालखी थांबते त्या ठिकाणी मोबाइल टॉयलेट, पाण्याची व्यवस्था, भाविकांच्या दर्शनासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. असा राहील मार्ग श्रींच्या पायी वारीचा मार्ग निश्चित असून, सोहळा शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, गोडबोले प्लॉट, जुने शहर येथून निघेल. डाबकी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरासमोरून, श्रीवास्तव चौक, जयगुरुदेव पेट्रोल पंप, श्री विठ्ठल-रुख्माई मंदिर, काळामारोती मंदिर, लोखंडी पुलावरून (मोठापूल), महाराणा प्रताप चौक (सिटी कोतवाली), गांधी रोड, महापालिका, निशांत टॉवर, चिवचिव बाजार प्रवेशद्वार, स्वावलंबी विद्यालयासमोरून मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगण येथे पालखीचा मुक्काम राहील. “गण गण गणात बोते’च्या गजराने भौरद दुमदुमले पालखीचा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम परंपरेनुसार पारस येथे झाला. भौरद येथे पालखी सोहळा मुक्कामासाठी पोहोचला. यावेळी पालखी सोहळ्यातील श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी लाखो लोकांनी रांगेत दर्शनाचा लाभ घेतला. गण गण गणात बोतेच्या गजरात संपूर्ण भौरद परिसर दुमदुमला होता. डाबकीजवळ असलेल्या कस्तुरी या सामाजिक संस्थेतर्फे श्रींचा अश्व व श्रींच्या पालखीचे पूजन व स्वागत कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले व माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रींच्या पालखीतील वारकऱ्यांना शीतल जल, शीतपेय, ऊन न लागण्यासाठीचे होमिओपॅथीचे औषध ”सनकुल”चे वितरण करण्यात आले. याप्रसंगी कस्तुरीचे संजय गायकवाड, राजेश्वर पेठकर, श्रीमती अनिता इधोळ, अमर शर्मा, घनश्याम चांडक, प्रा. डॉ. रत्ना चांडक, ॲड. अशोक शर्मा, प्रा. अनिल मुळे आदी उपस्थित होते. होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने “सनकुल’ औषध सेवा उपलब्ध करून दिली. यासाठी डॉ. सचिन धर्माधिकारी व डॉ. सुयोग जोहरापूरकर यांचे सहकार्य लाभले.
