शिवकालीन आणि मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर फुफ्फुसाच्या संसर्गामुळे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि मुली असा परिवार आहे. सांगली जिल्ह्यातील ‘तडसर’ हे डॉ. पवार यांचे मूळ गाव. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जयसिंगरावांच्या शिक्षणाची दिशा राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे बदलली. प्रारंभी अर्थशास्त्र विषयात रस नसतानाही त्यांनी नंतर इतिहासाची वाट धरली आणि शिवाजी विद्यापीठातून एम.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या वसतिगृहांमुळेच आपण शिकू शकलो, ही कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात कायम होती. ‘पंचगंगा तिरी’ या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांचा हा जीवनप्रवास उलगडला आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील अनेक अज्ञात साधने त्यांनी प्रकाशात आणली. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांचे चरित्र लेखून त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची जगाला ओळख करून दिली. तसेच, दादोजी कोंडदेव यांच्या संदर्भातील त्यांची ऐतिहासिक मांडणी ही संशोधक म्हणून त्यांची विशेष ओळख ठरली.
पवारांना हे मिळाले पुरस्कार आयुष्यभर शाहू विचारांनी झपाटलेल्या डॉ. पवार यांना त्यांच्या कार्यासाठी 21 हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्तेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता.
