Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

राष्ट्रवादी विलीनीकरणावर शशिकांत शिंदे यांचा ब्रेक, आता नो कॉमेंट्स:अजितदादांची चूक झाली असे म्हटले असेल, तर माझे शब्द मागे घेतो

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला नव्याने उधाण आले असताना, शशिकांत शिंदे यांनी अचानक या विषयावर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांच्या अकस्मित निधनामुळे अनेक राजकीय प्रश्न अनुत्तरित राहिले असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया देखील त्यामुळे रखडल्याचे ते म्हणाले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती, याबाबत दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे होत असताना शिंदे यांनी मात्र आता या विषयावर काहीही भाष्य करणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. अजित पवार गटातील नेत्यांच्या मते, दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली होती याबाबत स्पष्ट माहिती नाही. मात्र शरद पवार गटातील काही नेत्यांचे म्हणणे असे की, विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली होती आणि 12 फेब्रुवारी रोजी पक्ष एकत्र आणण्याची तयारीही झाली होती. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी, या मासिकात लेख लिहून अनेक खुलासे केले. त्या लेखात दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होऊन नेतृत्व अजित पवारांकडे देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. लेख प्रसिद्ध झाल्यानंतर शशिकांत शिंदे चर्चेच्या केंद्रस्थानी आले. माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणासंदर्भात काही निर्णय झाले होते आणि अजित पवार गटातील नेतेही त्याबाबत बोलत आहेत. आम्हीच मागे लागलोय असे चित्र निर्माण केले जात आहे, पण आमच्याकडून कोणतीही गडबड नाही. आम्ही जे बोललो ते सत्य बोललो. मात्र आता हा विषय आम्ही बंद केला आहे, असे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी अजित पवारांविषयीच्या आपल्या पूर्वीच्या वक्तव्याबाबतही स्पष्टीकरण दिले. मी जर अजितदादांची चूक झाली असे म्हटले असेल, तर मी माझे शब्द मागे घेतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, अजित पवारांना पक्षाच्या विभाजनाबाबत काही दुरुस्ती करायची होती आणि ते त्या विषयावर भावनिक होते. शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीतही अजित पवारांनी कधी नजरानजर केली नाही, असे शिंदे यांनी सांगितले. या विधानांमुळे दोन्ही गटांतील संबंध किती गुंतागुंतीचे होते, याची झलक मिळते. शिंदे यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रवादी पक्ष पुन्हा जोमाने काम करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे विलीनीकरणावर आता भाष्य करणे योग्य नाही, असे त्यांचे मत आहे. निवडणुकीनंतर या विषयावर अंतिम निर्णय घेण्याची चर्चा होती. विलीनीकरणाचे सूत्र काय असेल, नेतृत्वाची रचना कशी असेल, हे सर्व चर्चेत ठरवले जाणार होते. मात्र आता चर्चा करणारे प्रमुख नेतेच आपल्यात नाहीत, त्यामुळे जर-तर वर बोलण्यात अर्थ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावर ‘नो कॉमेंट्स’ची भूमिका विलीनीकरणाच्या चर्चेला आक्षेप घेणाऱ्यांना विचारले पाहिजे. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. अनेकांनी भावना व्यक्त केल्या. पण आता आम्हाला यावर काहीही बोलायचे नाही, असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर ‘नो कॉमेंट्स’ची भूमिका घेतली. त्यांच्या या वक्तव्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चेवर तात्पुरता पडदा पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एकूणच, अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या एकत्रीकरणाच्या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. एकीकडे अंतिम टप्प्यात चर्चा झाल्याचे दावे केले जात आहेत, तर दुसरीकडे आता त्या विषयावर मौन बाळगण्याची भूमिका घेतली जात आहे. शशिकांत शिंदे यांच्या विधानांमुळे या प्रकरणातील अनेक पैलू समोर आले असले, तरी त्यांनीच आता या विषयावर बोलणे थांबवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. पुढे पक्ष कोणती अधिकृत भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!