आदित्य ठाकरेंनी लायकीत अन् शिस्तीत बोलावे:मी बोललो तर तुम्ही शब्द ऐकू शकणार नाही, शिंदेंवरील टीकेनंतर नीलेश राणे आक्रमक

ठाकरे गट आणि राणे कुटुंबियांमधील राजकीय कलगीतुरा पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. आमदार नीलेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरेंनी लायकीत आणि शिस्तीत बोलावे, नाही तर आमचा तोल सुटायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी दिला आहे. नीलेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी आमचा तोल जाण्याची वेळ येऊ देऊ नये. आम्ही उद्धव ठाकरे यांना ‘साहेब’ म्हणून आदर देतो आणि तो नेहमीच देत राहणार. पण तुम्हीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला पाहिजे. तुमच्या वडिलांचे सरकार होते आणि ते मुख्यमंत्री होते म्हणून तुम्हाला थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते, तुमचे स्वतःचे असे काही कर्तृत्व नाही. त्यामुळे बोलताना आपल्या वयाचे भान ठेवावे. आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे नीलेश राणे म्हणाले की, जीभ सोडायला आम्हाला वेळ लागत नाही, मी काय बोलू शकतो हे संपूर्ण जगाला माहीत आहे. जर मी तोंड उघडले आणि बोलायला सुरुवात केली, तर तुम्ही ते शब्दही सहन करू शकणार नाही. आम्हाला बोलण्यासाठी कोणतीही बंधने नाहीत, आम्ही काहीही बोलू शकतो. परंतु, एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना नीटनेटक्या भाषेत आणि मर्यादेत बोलले पाहिजे. वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबद्दल चुकीचे शब्द वापरताना आदित्य ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
..तर आडनावाचा विचार करणार नाही नीलेश राणे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून आज उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आदित्य ठाकरेंचे वय काय आणि ते बोलतात काय? ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असते, पण जर एकदा ती मुठ सुटली तर मग समोर कोण कोणत्या आडनावाचा आहे, याचा आम्ही विचार करणार नाही. आता पूर्वीसारखे दिवस राहिले नसून कोण कोणाचे ठाकरे राहिलेत, अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी निशाणा साधला. राऊत हे भंगार माणूस याच वेळी नीलेश राणे यांनी ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावरही नेहमीच्या शैलीत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर बोलताना राणे म्हणाले, संजय राऊत हे पूर्णपणे भंगार माणूस आहेत. ते कधीच चांगली आणि सुसंस्कृत भाषा बोलू शकत नाहीत. केवळ शिवीगाळ करणे आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलणे एवढीच त्यांची भाषा आहे, अशा शब्दांत राणेंनी राऊत यांच्या टीकेचा कचरा केला.

Leave a Comment

error: Content is protected !!