तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने दांडी मारल्यामुळे खरीप हंगाम चिंतेत सापडला आहे. जून महिना संपत आला तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार ९६८.१३ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान, पेरणीयोग्य ७५ ते १०० मिमी पाऊस व जमिनीत किमान अर्धा फूट ओलावा झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच ७ जुलैपर्यंत मूग व उडीदाची पेरणी करता येऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने कोरड्या जमिनीत पेरणी करू नये, तसेच ७ जुलै नंतर मात्र मूग व उडीद पेरू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने धरणे व तलाव समाधानकारक भरल्यानंतरच ऊस व केळीसारख्या बारमाही व जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे ही आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे. यंदा २५ मे रोजी सुरू झालेले रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले. त्यानंतर ८ जूनपासून सुरू झालेल्या मृग नक्षत्रातही समाधानकारक पाऊस झाला नाही. २१ जूनला मृग नक्षत्र संपल्यानंतर आता आर्द्रा नक्षत्रात तरी पेरणीयोग्य पाऊस पडेल का, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पुढील महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मशागतीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. मात्र पाऊस नसल्याने पेरणीला सुरुवात करता आलेली नाही. अनेक शेतकरी रोज आभाळाकडे नजर लावून बसले आहेत. यंदाचा खरीप हंगाम वाया जाणार का, या चिंतेने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून बियाणे विक्रेत्यांनी ही कोट्यवधी रुपयांचे बियाणे दुकानांमध्ये उपलब्ध करून ठेवली आहे. मात्र पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने विक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय खरीप क्षेत्र (हेक्टरमध्ये) ^७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय किंवा जमिनीतील ओल अर्धा फूट गेल्याशिवाय पेरणी करू नये. तसेच शेतकऱ्यांनी बीबीएफ किंवा टोकन पद्धतीचा अवलंब करावा. अल निनोमुळे यंदा पाऊस कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. शुक्राचार्य भोसले, जिल्हा कृषी अधिकारी, सोलापूर खरीपाची पेरणी वेळेवर होणार नाही, याची चिंता माझ्याकडे सहा एकर शेती आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही वेळेवर पाऊस पडेल या आशेने शेतीची संपूर्ण मशागत केली आहे. मात्र जून महिना संपत आला तरी पाऊस पडला नाही. त्यामुळे खरीपाची पेरणी वेळेवर होणार की नाही, याची चिंता आम्हा शेतकऱ्यांंना लागून राहिली आहे. लिंगेश्वर तकटे, शेतकरी, पांडे अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागासह विविध हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याचा जलसाठ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करूनच पीक नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
