वृक्षमित्र पोपटराव रसाळ यांनी स्मशानभूमी परिसरात गेल्या सात वर्षांपासून वृक्षारोपण करून हा भाग निसर्गरम्य केला आहे. त्यांचे हे कार्य निघोजकरांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन ‘संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन’चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी केले. येथील स्मशानभूमी परिसर, दशक्रिया विधी घाट आणि बाजारतळ या ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वड, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ, करंज आणि आंबा या प्रजातींच्या जवळपास २०० हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षमित्र पोपटराव रसाळ, स्थानिक ग्रामस्थ आणि मुलिकादेवी विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. रसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या ७ वर्षांत या भागात ५०० हून अधिक झाडे जगवली असून मोरवाडी व रसाळवाडी येथे ‘वृक्ष बँके’ची स्थापना केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने आणि शांताराम लंके व बाबासाहेब कवाद यांच्या हस्ते त्यांनी मोरवाडी परिसरात हजारो वृक्षांचे संवर्धन केले आहे. कार्यक्रमास माजी अध्यक्ष प्रभाकर कवाद, संतोषशेठ रसाळ, दत्तात्रय रसाळ, राजेंद्र लाळगे, पत्रकार संघाचे अमोल खिलारी, भास्करराव कवाद, माजी उपसभापती खंडू भुकन आदींसह मान्यवर उपस्थित होते. सचिन वराळ यांनी “कोरोना काळानंतर ऑक्सिजनचे महत्त्व समजले असून रसाळ यांच्या कृतीतून प्रेरणा घेण्याची गरज आहे, असे सांगितले. प्रा. अमोल खिलारी यांनी वाढत्या तापमानावर बोट ठेवत प्रत्येक नागरिकाने एक झाड लावण्याचे आवाहन केले आणि एनएसएस विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. ५ वर्षांत १० हजार वृक्षलागवडीचा संकल्प “अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने मी औरंगाबाद येथे २५ हजार वृक्ष लावून ‘वृक्ष बँक’ स्थापन केली होती. आता आपल्या गावाचे ऋण फेडण्यासाठी निघोज परिसरात लोकसहभागातून हजारो वृक्षांचे संवर्धन करत आहे. येत्या ५ वर्षांत १० हजार वृक्षारोपणाचा आमचा संकल्प असून प्रत्येक निघोजकर यासाठी मोलाची मदत करत आहे, असे वृक्षमित्र रसाळ म्हणाले.
