सरसकट कृषी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसानभरपाईसह सर्व प्रलंबित मागण्या सरकारने मान्य कराव्यात. अन्यथा, आगामी काळात गुरे, ढोरे आणि बकऱ्यांसह थेट मंत्रालयात घुसणार, असा इशारा खासदार नीलेश लंके यांनी दिला आहे. आज आम्ही पारनेरच्या तहसीलवर आलो आहोत, उद्या नगर-पुणे महामार्ग रोखू आणि त्यानंतर थेट मंत्रालय गाठू,असाही इशारा त्यांनी दिला. शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, भूमिपुत्र शेतकरी संघटना, मनसे, शिवबा संघटना, संभाजी ब्रिगेड व विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तहसीलवर मंगळवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना खासदार लंके म्हणाले, आजचे हे आंदोलन फक्त ठिणगी असून, उसका वणवा संपूर्ण महाराष्ट्रात पेटणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. खा. लंके यांच्या संपर्क कार्यालयापासून या ऐतिहासिक मोर्चाला सुरुवात झाली. बैलगाड्या, ट्रॅक्टर, दुचाकी आणि शेळ्या-मेंढ्यांसह निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयावर पोहोचला. ‘सातबारा कोरा करा’, ‘कर्जमाफी द्या’, ‘कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले होते. मोर्चा सुरू झाला तेव्हा कडक उन्हाचा तडाखा होता; मात्र आंदोलक तहसीलवर पोहोचताच आभाळ दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला.भरपावसात भीजत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली आणि आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले.खासदार लंके म्हणाले, एकेकाळी कृषिप्रधान म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या देशात आज शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि दुर्दैवाने त्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे, ही लाजिरवाणी बाब आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या शेतकऱ्याला मदत देण्याऐवजी हे सरकार जाचक अटी-शर्तींचे जाळे विणत आहे. शेतकरी आत्महत्यांचे सर्वात मोठे पाप या सरकारच्या माथी आहे. यापुढे राज्यात जर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, तर पोलिसांना केवळ पंचनामा करून चालणार नाही, तर संबंधित सत्ताधारी लोकप्रतिनिधींवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि चुकीच्या धोरणांमुळेच बळीराजा मृत्यूला कवटाळत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त करत, यापुढे सरकारी कार्यालयांत शेतकऱ्यांची अडवणूक झाली तर जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. या जनआक्रोश मोर्चात बाजार समिती सभापती गंगाराम बेलकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, शिवसेनेचे (उबाठा) उपजिल्हाप्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे, बाजार समितीचे संचालक रा. या. औटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कावरे, करभारी पोटघन, ॲड. राहुल झावरे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, मनसेचे तालुकाप्रमुख अविनाश पवार, आर. आर. राजदेव, अनिल शेटे, सोनिया राजदेव, राजेंद्र लंके, संदीप मोढवे आदी सहभागी झाले होते. “महाराष्ट्र खा. लंके यांच्या पाठीशी उभा राहील’ ^सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा खासदार नीलेश लंके पुढील आंदोलनाची जी दिशा ठरवतील, त्यात आम्ही संपूर्ण ताकदीने सहभागी होऊ. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत प्रामाणिकपणे आवाज उठवणारे ते मोजके लोकप्रतिनिधी आहेत. – डॉ. भास्करराव शिरोळे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा.
