सना मलिक यांचे विधान वैयक्तिक, पक्षाचा संबंध नाही:सुनील तटकरेंकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट- तिहेरी तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात (23 जून 2026) ‘तिहेरी तलाक’ आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) यावरून सत्ताधारी महायुतीमध्येच मोठा गदारोळ झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी ‘भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी’ असे वादग्रस्त विधान केले होते, ज्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज एक अधिकृत निवेदन जारी करत सना मलिक यांच्या विधानापासून पक्षाला वेगळे केले आहे. “सना मलिकांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून पक्ष त्यांच्याशी सहमत नाही,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. सुनील तटकरे यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका सुनील तटकरे यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. “आमदार श्रीमती सना मलिक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेदरम्यान तलाक संदर्भात केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या या मताशी सहमत नाही.” “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच जात, धर्म किंवा पंथ बाजूला ठेवून महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ठामपणे भूमिका घेत आलेला आहे. कोणत्याही महिलेवर केवळ एका बाजूने, अन्यायकारक पद्धतीने वैवाहिक नाते संपुष्टात आणण्याची टांगती तलवार असू नये, ही पक्षाची भूमिका आहे.” “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला मानणारा आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तिहेरी तलाक संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि संसदेने संमत केलेला कायदा हा सर्वोच्च आहे. त्याचे पालन आपण सर्वांनी केले पाहिजे.” “तथापि, आमदार सना मलिक यांना घटनेनुसार बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती,” असे तटकरे यांनी शेवटी नमूद केले. २३ जूनला विधानसभेत नेमकं काय घडलं होतं? भाजपची लक्षवेधी आणि UCC ची मागणी: भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील तिहेरी तलाकचे उदाहरण देत, “पाकिस्तानात बहुत्नीत्वावर बंधने आहेत, तर भारतात का नाहीत? राज्य सरकार समान नागरी कायदा (UCC) कधी लागू करणार?” असा सवाल उपस्थित केला. यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी “UCCचा मसुदा तयार करण्यासाठी एका निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली लवकरच समिती स्थापन केली जाईल,” असे आश्वासन दिले. सना मलिकांचा आक्रमक पवित्रा: या चर्चेत सहभागी होत सना मलिक यांनी भाजपला लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, “पाकिस्तानने नवीन काही केलेले नाही, त्यांनी कुराणची अंमलबजावणी केली आहे. भारतातही कुराणची अंमलबजावणी व्हावी, ही आमची मागणी आहे. फक्त मुस्लिम पुरुषच अनेक महिलांशी लग्न करतात असे नाही, इतर धर्मांतही बहुपत्नीत्व आहेच.” भाजपचा पलटवार: सना मलिकांच्या ‘कुराणच्या अंमलबजावणीच्या’ विधानावर भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी कडाडून विरोध केला. “हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो, कुराणवर नाही,” अशा शब्दांत त्यांनी मलिकांना ठणकावले. यावेळी सना मलिकांना बोलण्यापासून रोखले जात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिला. “त्यांचे मत कुणाला आवडो वा न आवडो, त्यांना बोलण्यापासून रोखणे चुकीचे आहे. मी त्यांच्या भूमिकेला समर्थन देतो,” असे पाटील म्हणाले होते. सना मलिक यांच्या विधानामुळे महायुतीत (भाजप आणि राष्ट्रवादी) वैचारिक दुफळी चव्हाट्यावर आल्याने, सुनील तटकरे यांनी तत्काळ डॅमेज कंट्रोल करत हे विधान पक्षाचे नसून ‘वैयक्तिक’ असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे. संबंधित बातमी वाचा… तिहेरी तलाक आणि UCC वरून विधानसभेत गदारोळ:सना मलिक म्हणाल्या- बहुपत्नीत्व केवळ मुस्लिम धर्मात नाही; भाजपचा पलटवार- हा देश संविधानावर चालतो, कुराणवर नाही!
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदार सना मलिक यांनी आक्रमक भूमिका घेत “भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी” असे विधान केले. यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि सत्ताधारी पक्षातील वैचारिक दुफळी चव्हाट्यावर आली. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Comment

error: Content is protected !!