मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर:वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सतर्कतेचा इशारा; अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट

मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानंतर मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून तो आता गोव्यात पोहोचला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मोसमी वारे राज्यात वेळेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. विशेषतः कुडाळ तालुक्यात विविध भागांत पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 ते 20 मि.मी. पावसाचा अंदाज व्यक्त केला असून जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीवर पावसासाठी अनुकूल स्थिती तयार होत असल्याचेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. परभणी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी दुसरीकडे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्यापासून दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी या पावसाचे स्वागत केले. काही भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीण भागातही पावसामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी खरीप हंगामासाठी हा पाऊस सकारात्मक मानला जात आहे. शहरासह ग्रामीण भागात वातावरण आल्हाददायक बनले असून मान्सूनच्या आगमनाची चाहूल अधिक स्पष्ट झाली आहे. पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे हवामान विभागाने पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. प्रवीण कुमार यांच्या मते, पुढील 48 तासांत दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात पावसाची शक्यता अधिक आहे. दरम्यान, विदर्भात सध्या तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसदरम्यान कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र 10 जूननंतर तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून खरीप हंगामाच्या तयारीसाठीही ही परिस्थिती अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची उलटगणती आता सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा येथे जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, माण तालुक्यातील दहिवडी आणि मलवडी परिसरात मंगळवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. एका मोठ्या झाडाची फांदी रस्त्यावर कोसळल्याने दहिवडी-मलवडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खरीप पेरणीसाठी घाई करू नये या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खरीप पेरणीसाठी कोणतीही घाई करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा अंतिम निर्णय घ्यावा, असे नमूद केले. अपुऱ्या पावसामुळे बियाण्यांचे नुकसान होण्याचा धोका टाळण्यासाठी संयम आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. यंदा पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून योग्य नियोजन, समाधानकारक पाऊस आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास यंदाचा खरीप हंगाम यशस्वी ठरेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!