यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंचा घणाघात:गद्दारांनी आईची शपथ घेऊन विश्वासघात केला, म्हणाले- पुढचा खासदार आमचाच निवडून येणार

“जी लोकं कालपर्यंत माझ्यासोबत होती आणि आज ती फुटली, या लोकांची मला लाज वाटते. माझ्या नावावर आणि माझ्या दौऱ्यांमुळेच हे खासदार निवडून आले होते. या गद्दारांनी चक्क आईची शपथ घेऊन गद्दारी केली आणि गद्दारांच्या कळपात जाऊन सामील झाले. म्हणूनच, या मतदारसंघात येऊन मी माझ्या मतदारांची जाहीर माफी मागण्यासाठी आलो आहे,” अशा भावनिक शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांचे वाभाडे काढले. यवतमाळच्या महासभेत बोलताना त्यांनी बंडखोर खासदार संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडिओही दाखवला. पक्ष चोरला, चिन्ह चोरले, तरी ठाकरे उभे
केंद्रीय यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवताना उद्धव ठाकरे म्हणाले, “यांनी आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरले, आमदार-खासदार फोडले तरीही ठाकरे आज ताठ कण्याने मैदानात उभा आहे. आमदार फोडल्यानंतरही शिवसैनिकांनी मेहनत करून या खासदारांना पुन्हा निवडून दिले होते, पण हे विकले गेले. सध्या राज्यात निवडणुका नसतानाही ही फोडाफोडी सुरू आहे. पण मी सांगतो, जोपर्यंत जनतेचे प्रश्न संपत नाहीत, तोपर्यंत कोणीही ठाकरे किंवा शिवसेना संपवू शकणार नाही. जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा याच मतदारसंघातून पुन्हा ठाकरेंचाच खासदार निवडून येईल.” राम मंदिराच्या दानपेटीत चोरी आणि विकासनिधीवर सवाल
भाजपवर थेट निशाणा साधत उद्धव ठाकरे म्हणाले, “आज देशात राम मंदिराच्या दानपेटीतील पैसे चोरले जात आहेत. हे सरकार केवळ लूट करत आहे. हे खासदार म्हणतात की विकासनिधीसाठी आम्ही गेलो; पण मला सांगा, हा विकासनिधी काय फक्त भाजपच्या मालकीचा आहे का? तो जनतेच्या हक्काचा पैसा आहे.” ६ खासदारांच्या बंडानंतर विदर्भातील पहिल्याच सभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना थेट गाडण्याचा इशारा दिला असून, या सभेला शिवसैनिकांनी अलोट गर्दी केली होती. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा लढून दाखवा- संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ येथील जाहीर सभेत खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांसह भाजपवर जोरदार टीका केली. “माझ्यासारखे लाखो निष्ठावंत शिवसैनिक आहेत, म्हणूनच शिवसेना आजही संकटात खंबीरपणे उभी आहे,” असे सांगत त्यांनी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे कौतुक केले. ‘५० कोटींचा भाव मिळाला’ सभास्थळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात असल्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले, “या बाजार समितीत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, पण इथल्या खासदाराला ५० कोटींचा भाव मिळाला. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत त्याची ५ रुपयांचीही किंमत राहणार नाही.” तसेच, “गद्दारी करायची असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवा,” असे आव्हानही त्यांनी दिले. मोदी आणि बंडखोरांवर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राऊत म्हणाले, “१२ वर्षांत विकास झाला नाही, तर हे खासदार काय विकास करणार?” बंडखोर खासदार मोदींचे “बुट चाटायला” गेले, अशी जहरी टीकाही त्यांनी केली. “शिवसेना कधीच संपत नसते आणि यवतमाळ हा कायम बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत राहिलेला शिवसैनिकांचा जिल्हा आहे,” असेही राऊत यांनी ठामपणे सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत विमानात ‘उच्चस्तरीय चर्चा’- ठाकरे आपल्या विदर्भ दौऱ्याच्या सुरुवातीला यवतमाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमानातील प्रवासादरम्यान ‘उच्चस्तरीय चर्चा’ झाल्याची मिश्कील प्रतिक्रियाही दिली. गद्दार खासदारांना भरघोस हमीभाव मिळाला- ठाकरे शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर तीव्र संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आज राज्यातील गरीब शेतकऱ्यांच्या शेतमालाला साधा हमीभाव मिळत नाहीये; मात्र आमच्या भरवशावर निवडून आलेल्या या गद्दार खासदारांना (खोक्यांच्या स्वरूपात) भरघोस हमीभाव मिळाला आहे. त्यांना पैसे मिळाले हे त्यांनी स्वतःच जाहीरपणे मान्य केले आहे.” ६ खासदारांच्या पक्षांतरानंतर शिवसैनिकांमध्ये नवी ऊर्जा भरण्यासाठी आणि बंडखोरांना जाहीर आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे आजपासून थेट मैदानात उतरले असून, त्यांच्या या दौऱ्यामुळे विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. गद्दार खासदारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय- अरविंद सावंत उद्धव ठाकरे हे काही चार्टर्ड विमानाने आले नाही, त्यांचा दौरा ठरलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते एकाच विमानातून आले हा केवळ योगायोग आहे, असे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. विमानात काही चर्चा होत नसते. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्याच लोकांसोबत अधिक लढावे लागले आणि छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात आपलीच गद्दार औलाद होती ती अजून थोडी थोडी जिवंत आहे. अरविंद सावंत म्हणाले की, यवतमाळ हा कुठल्या खासदारांचा मतदारसंघ नाही ती काही त्यांची मालकी नाही. मतदारसंघ लोकसभेचा आहे तो आम्ही जिंकला होता. मतदारांचा कौल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे होता त्या मतदारांच्या कौलाचा हा अपमान विद्यमान खासदार यांनी केला. ते निवडून येण्यासाठी शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले. पण हे लाचार, व्याभिचारी औलाद यवतमाळमध्ये निर्माण झाली, यापूर्वीही असाच एक होता. त्यांचेही पहिले नाव तेच होते, असे म्हणत संजय राठोड यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तर दुसऱ्या गद्दाराला त्यावेळी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असता पण उद्धव ठाकरेंनी वाचवल्याचेही सावंत म्हणाले. नेत्यांची मोठी फौज मैदानात
या जाहीर सभेसाठी ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि अनिल देसाई यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते यवतमाळात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शिवसैनिक मोठ्या संख्येने सभेसाठी आले असून कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मोठी गर्दी केली आहे. सलग सभांचा धडाका यवतमाळच्या या सभेनंतर उद्धव ठाकरे सलग वाशीम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी येथे देखील अशाच सभा घेणार आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात पुढील 48 तास महत्त्वाचे:पुणे, कोकणसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करणार आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पुण्यासहित राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. शनिवार आणि रविवारी (२७ व २८ जून) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक असेल, असा अंदाज वर्तवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!