उद्धव ठाकरे हे काही चार्टर्ड विमानाने आले नाही, त्यांचा दौरा ठरलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते एकाच विमानातून आले हा केवळ योगायोग आहे, असे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. विमानात काही चर्चा होत नसते. छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्याच लोकांसोबत अधिक लढावे लागले आणि छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात आपलीच गद्दार औलाद होती ती अजून थोडी थोडी जिवंत आहे. अरविंद सावंत म्हणाले की, यवतमाळ हा कुठल्या खासदारांचा मतदारसंघ नाही ती काही त्यांची मालकी नाही. मतदारसंघ लोकसभेचा आहे तो आम्ही जिंकला होता. मतदारांचा कौल हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे होता त्या मतदारांच्या कौलाचा हा अपमान विद्यमान खासदार यांनी केला. ते निवडून येण्यासाठी शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले. पण हे लाचार, व्याभिचारी औलाद यवतमाळमध्ये निर्माण झाली, यापूर्वीही असाच एक होता. त्यांचेही पहिले नाव तेच होते, असे म्हणत संजय राठोड यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तर दुसऱ्या गद्दाराला त्यावेळी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असता पण उद्धव ठाकरेंनी वाचवल्याचेही सावंत म्हणाले. मतदारांनी मशालीला मतदान केले अरविंद सावंत म्हणाले की, लोकांचा मशालीवर विश्वास होता त्यांनी मशालीला मतदान केले त्यावर हे लोकं निवडून आले आणि मतदारांना न विचारता पक्ष सोडला. मतदारसंघातील कामांचे नाव पुढे करत हे लोकं तिकडे गेली. हे सर्व लोकं विकले गेलेले आहेत. त्यांच्या खासदार निधीचा वापर त्यांनी केला नाही, आणि निधीसाठी पक्षसोडावा लागला म्हणता ही गद्दारी आहे. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. पक्षांतर करणे जनतेचा अपमान अरविंद सावंत म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी आणि कायदा-सुव्यवस्थेबद्दल बोलले जाते का? केवळ याला विकत घेतले हीच चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा महाराष्ट्रावर भगवा फडकवण्यासाठीच आहे. पक्षांतर करायचे असेल तर राजीनामा देत करावे लागेल असा कायदा आला पाहिजे. कोणाला न विचारता थेट पक्षांतर करणे हा जनतेचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे.