जीएसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कापूरवाडी तलावातून उपसला दीड टन कचरा:जीएसटी दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गोळा केल्या 22 गोण्या प्लास्टिक

९ व्या जीएसटी दिना’चे औचित्य साधून वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपताना एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या ऐतिहासिक आणि जैवविविधतेने नटलेल्या कापूरवाडी तलाव परिसरात गुरुवारी सकाळी ६ ते ८ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जीएसटीच्या टीमने या मोहिमेदरम्यान तलाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आलेला प्लास्टिक कचरा, काचा, कपडे, तसेच सण-उत्सवानंतर विसर्जित केलेले निर्माल्य आणि मूर्तींचे तब्बल २२ गोण्या (सुमारे दीड टन) अवशेष गोळा केले. गोळा केलेला हा सर्व कचरा पुढील प्रक्रियेसाठी आणि पुनर्वापरासाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला.कापूरवाडी तलाव देशात नवव्या क्रमांकावर!या मोहिमेचे मुख्य आयोजक आणि राज्यकर निरीक्षक तुषार लहारे यांनी कापूरवाडी तलावाचे महत्त्व सांगताना माहिती दिली की, दरवर्षी जागतिक पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’ या उपक्रमात कापूरवाडी तलावाच्या परिसरात तब्बल १५६ वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. या कामगिरीमुळे हा तलाव संपूर्ण भारतात नवव्या क्रमांकावर राहिला आहे. हिवाळ्यात येथे अनेक परदेशी व स्थलांतरित पक्षी येतात, त्यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे. या मोहिमेत सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे, संतोष उंदरे, राज्यकर निरीक्षक तुषार लहारे, तसेच पर्यावरणप्रेमी अमित गायकवाड, संदेश कपाळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “नागरिकांनी देवाच्या मूर्ती आणि निर्माल्य तलावात न टाकता पर्यावरणपूरक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन यावेळी महिला अधिकाऱ्यांनी केले. तसेच, यापुढे स्वतः प्लास्टिकचा वापर मर्यादित करू आणि इतरांनाही निसर्गाची हानी करण्यापासून रोखू, अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. मंगळवारी चांदबिबी महाल परिसरात स्वच्छता मोहीम ३० जून रोजी सकाळी ६ वाजता अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक चांदबिबी महाल येथे ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महामार्ग ते चांदबिबी महालापर्यंतचा परिसर प्लास्टीकमुक्त करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठी सहायक राज्यकर आयुक्त दत्तात्रय भिसे हे “जगण्याचा पासवर्ड करूया” यावर मार्गदर्शन करणार आहेत. तर १ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयेाजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!