उद्धव ठाकरे यांना लोकांची ऍलर्जी असल्यामुळेच आज त्यांच्यावर कुठल्यातरी मंगल कार्यालयात जाऊन सभा घेण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरे हे आत्ता कुठे घराबाहेर पडले आहेत आणि बाहेर पडून लोकांना ‘गद्दार-गद्दार’ म्हणून हिणवत आहेत. मात्र, कालपर्यंत हेच लोक जेव्हा तुमच्यासोबत होते, तेव्हा ते चांगले होते आणि आता अचानक गद्दार कसे झाले? असा सवाल करत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. श्रीकांत शिंदे म्हणाले की, 2019 मध्ये हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे पाय धरले. त्यामुळे शिवसैनिकांचा आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला असून आजही हजारो कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तर खासदार आणि आमदार पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात जाऊन केवळ शिव्या देणे एवढेच तुम्हाला शिकवले आहे का? तुम्ही कधी आत्मपरीक्षण करणार आहात की नाही? असा सवाल ही शिंदेंनी केला आहे.
ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे श्रीकांत शिंदे म्हणाले की, सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधी आज मोठ्या संख्येने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जोडले जात आहेत; कारण लोकांच्या अडीअडचणीच्या काळात केवळ शिंदे त्यांच्यासाठी धावून जातात आणि उपयोगी पडतात. आज ठाकरे यांच्यावर जी परिस्थिती ओढावली आहे, त्याचे त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करायला हवे. आम्ही शिव्या देण्यासाठी दौरा करत नाही श्रीकांत शिंदे म्हणाले की, माझा दौरा आधीपासूनच नियोजित आणि सुरू आहे. आतापर्यंत मी 62 विधानसभा मतदारसंघांचा दौरा पूर्ण केला आहे. पुढील आठवड्यात मी विदर्भ आणि कोकण दौऱ्यावर जाणार आहे. आमचा दौरा कोणाला शिव्या-शाप देण्यासाठी नसतो, तर तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद आणि बळ देण्यासाठी असतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. विरोधक एकनाथ शिंदेंच्या संपर्कात श्रीकांत शिंदे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात सर्वच पक्षांचे लोक आहेत. विरोधक असले तरी शिंदे त्यांच्या मतदारसंघातील कामे करून देतात, हा सर्वांना विश्वास आहे. आम्ही सर्वांच्याच संपर्कात आहोत आणि म्हणूनच लोक शिवसेनेसोबत जोडले जात आहेत. पण जे कोणाच्याच संपर्कात नसतात, त्यांची काय अवस्था होते हे सर्वांना माहीतच आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर आणि श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. राजकारणातील अशा चर्चांना काही अर्थ नसतो, असे सांगत, “खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेनेत येण्याने पक्षाची ताकद निश्चितच अधिक वाढली आहे.
