लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या आणीबाणीच्या आठवणींना उजाळा:डॉ. उपेंद्र कोठीकर यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गजांची कार्यक्रमाला उपस्थिती‎

२५ जून १९७५ हा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता. ज्यावेळी सत्तेसाठी देशातील जनतेच्या स्वातंत्र्याला बेड्या घातल्या गेल्या, तो भीषण कालखंड देश कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी केले. भारतीय जनता पार्टी वरूड – मोर्शी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्तच्या विशेष स्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. आणीबाणीच्या काळातील क्रूरता, वृत्तपत्रांवर आलेली सेन्सॉरशिप आणि लोकशाही रक्षकांसाठीचा संघर्ष या प्रदर्शनीच्या माध्यमातून जिवंत करण्यात आला होता. उपस्थितांनी ही प्रदर्शनी अत्यंत गंभीरतेने पाहिली. या कार्यक्रमाला भाजप अमरावती जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाही रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस प्रो. डॉ. सुमित पवार, आणीबाणीचे अमरावती ग्रामीणचे संयोजक राजेश्वर निस्ताने, वरूड नगर परिषदेचे नगराध्यक्ष ईश्वर सलामे, शेंदुरजनाघाट नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा वरखडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!