Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

भाजप सत्तेसाठी खालच्या थराला गेलंय:विजय वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टीका; म्हणाले-यंत्रणांचा गैरवापर थांबला तर ते कुठेच जिंकणार नाही

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका करत अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. आगामी महापालिका निवडणुकांपासून ते बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण, मंत्र्यांच्या संपत्तीत झालेली वाढ, रश्मी शुक्ला अहवाल, ध्रुवीकरणाचे राजकारण आणि मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरण यावर वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रासाठी घातक असल्याचा आरोप करत, भाजप केवळ सत्तेसाठी राज्यातील वातावरण बिघडवत असल्याचे ते म्हणाले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महापालिकेबाबत ठाम दावा केला. चंद्रपूर महापालिकेत शंभर टक्के काँग्रेसचा तिरंगा फडकणार असून, ते रोखण्याची ताकद कुणातही नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मुंबई महापालिकेवरही त्यांनी भाष्य करत भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई ताब्यात हवी आहे, मात्र हा ताबा मुंबईकरांच्या विकासासाठी नसून गुजरातच्या दावणीला मुंबई बांधण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातमधील ‘आक्यांना’ मुंबई हवी आहे, कारण मुंबई ताब्यात आली तर महाराष्ट्र ताब्यात राहील, अशी भाजपची भूमिका असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या भाषणातून मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची चिंता दिसत नसून, भविष्यात महाराष्ट्र महाराष्ट्रीय जनतेचा राहील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप निवडणुकांमध्ये यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, जर आज सरकारने प्रशासन, तपास यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्थेचा वापर केला नाही, तर भाजप कुठेही जिंकू शकणार नाही. भाजप 51 टक्के मतांचे स्वप्न पाहत आहे, मात्र निवडणूक आयोगाने आपले काम नीट केले तर भाजपची सत्ता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. राज्यातील जनतेत प्रचंड नाराजी असून अनेक ठिकाणी उमेदवारांना लोक थेट हाकलून देत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती मुद्दाम बिघडवली जात असून समाजात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील महिलांना गृहीत धरून भाजपचे राजकारण सुरू बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला भाजपकडून नगरसेवक बनवण्यात आल्यावर वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आपण स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो आणि संबंधित संस्थेला घटनेची माहिती होती, असे त्यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन आणि संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आपण केली होती, असेही ते म्हणाले. अशा प्रकरणात नाव असलेल्या लोकांना नगरसेवक बनवणे म्हणजे भाजपची मानसिकता उघड करणारे असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक ठिकाणी बलात्काराचे आरोपी बाहेर आले की त्यांचा सत्कार केला जातो, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील महिलांना गृहीत धरून भाजपचे राजकारण सुरू असून, सत्तेसाठी भाजप खालच्या थराला जात असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. गेल्या पाच वर्षांत काही लोकांनी हजारो कोटींची संपत्ती जमा केली मंत्र्यांच्या संपत्तीवर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी गेल्या पाच वर्षांत काही लोकांनी हजारो कोटींची संपत्ती जमा केल्याचा आरोप केला. कुणाची संपत्ती किती वाढली, याची चौकशी झाली तर कोणीही सुटणार नाही, असे त्यांनी सांगितले. काही मंत्र्यांच्या व्यवहारांची आणि संपत्तीची माहिती खुलेपणाने उपलब्ध असून, त्यांनी दाखवलेली संपत्ती प्रत्यक्षात खूपच कमी असल्याचा दावा त्यांनी केला. ही संपत्ती कष्टातून मिळाली असली तरी ती शंभर पट नव्हे, तर दोनशे पट वाढलेली आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. रश्मी शुक्ला यांचा अहवाल सोयीचा रश्मी शुक्ला अहवालावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी हा अहवाल सोयीचा असल्याचे सांगितले. रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच सुरू होता, हे सर्वांनाच माहीत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्या काळात तयार झालेला अहवाल सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा असणे यात नवीन काही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या अहवालात तथ्य असल्याचे आपण मानत नसल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानपदावरून ओवैसी यांच्या वक्तव्यावर बोलताना, जो कोणी संविधान मानतो तो पंतप्रधान होऊ शकतो, लोकशाहीत जनता ज्याला निवडून देईल तोच पंतप्रधान होतो, असे त्यांनी सांगितले. ओवैसी मुस्लिम कार्ड खेळतात आणि भाजप हिंदू कार्ड, मात्र दोघेही ध्रुवीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय महापालिकेत सत्ता स्थापन होणार नाही मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. मुंबईत काँग्रेसचे चांगले नगरसेवक निवडून येतील आणि काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय महापालिकेत सत्ता स्थापन होणार नाही, असा दावा त्यांनी केला. महापौर काँग्रेसच्या पाठिंब्यावरच होईल, हे स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. कुणाला सत्तेसाठी गरज पडली, तर काँग्रेसशिवाय पर्याय नसेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत वडेट्टीवार यांनी भाजपला आगामी निवडणुकांसाठी थेट आव्हान दिले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!