Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

भाजपची उमेदवारी निश्चित नसतानाही कृष्णराज महाडिकांचा अर्ज:स्वतःच्या ताकदीवर लढणार; कोल्हापुरात राजकीय हालचाल

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कृष्णराज महाडिक यांनी आपल्या राजकीय वाटचालीचा अधिकृत प्रारंभ झाल्याची भावना व्यक्त केली आहे. भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवार यादी जाहीर झालेली नसतानाही त्यांनी पुढाकार घेत अर्ज दाखल केला असून, हा निर्णय आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचं त्यांनी सांगितलं. कुटुंबीयांचा आशीर्वाद, मित्रांचा विश्वास आणि समर्थकांचं पाठबळ घेऊन आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचं महाडिक यांनी स्पष्ट केलं. आजचा दिवस हा केवळ निवडणूक प्रक्रियेचा भाग नसून, आपल्या सार्वजनिक जीवनाच्या प्रवासाचा प्रारंभ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ही निवडणूक आपण स्वतःच्या ताकदीवर आणि जनतेच्या विश्वासावर लढवत असल्याचं सांगतानाच, खासदार धनंजय महाडिक यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम सोबत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. सध्या खासदार धनंजय महाडिक यांच्यावर राज्यातील आणि विविध जिल्ह्यांतील जबाबदाऱ्या असल्यामुळे ते किती वेळ थेट प्रचारासाठी देऊ शकतील, याबाबत अनिश्चितता असली तरी त्यांचे मार्गदर्शन आपल्यासाठी महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांच्या साथीनं आपण ही निवडणूक सक्षमपणे लढवू, असा विश्वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. आतापर्यंत सामाजिक कामांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्न, नागरिकांच्या अडचणी आणि स्थानिक विषयांवर सक्रिय राहिल्याचा अनुभव आपल्याला उपयोगी पडेल, असंही त्यांनी सांगितलं. नागरिकांकडून मिळणारा विश्वास हीच आपली खरी भांडवलं असल्याचं सांगत, कृष्णराज महाडिक यांनी विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय असणं अत्यावश्यक आहे, असं ते म्हणाले. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता टाऊन प्लॅनिंगच्या माध्यमातून नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन विकास करण्यावर आपला भर राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली. मागील अनेक वर्षांत कोल्हापुरात विविध विकासकामं झाली असली, तरी त्यांची योग्य देखभाल न झाल्यामुळे वारंवार त्याच कामांवर निधी खर्च करावा लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ही साखळी तोडून टिकाऊ आणि शाश्वत विकासाची दिशा घ्यावी लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. खेळ, शिस्त आणि नेतृत्व या बाबींवर बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले की, खेळांमधून मिळणारी शिस्त, संघभावना आणि जीवनमूल्ये ही केवळ पुस्तकातून शिकता येत नाहीत. त्यामुळे युवकांना खेळ, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. निवडणुकीच्या काळात विरोधकांकडून टीका, आरोप आणि प्रत्यारोप होणार हे अपेक्षित असल्याचं सांगत, त्याकडे लक्ष न देता आपण विकासकामांवरच लक्ष केंद्रित करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. विरोधकांवर टीका करण्याऐवजी सकारात्मक कामातून उत्तर देण्यावर आपला भर असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शहरातील जवळपास 80 उमेदवारांसाठी होणारी टीका सहन करण्याची मानसिक तयारी आपली असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूरच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार कोल्हापूर शहराला दरवर्षी भेडसावणाऱ्या पूरस्थितीबाबत बोलताना कृष्णराज महाडिक यांनी महत्त्वाची माहिती दिली. मुख्यमंत्री स्तरावर तयार करण्यात आलेला पूरनियंत्रणाचा सविस्तर आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक पार पडताच शासन स्तरावर हा विषय प्राधान्याने हाताळला जाईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूरमुक्त कोल्हापूर हे केवळ आश्वासन न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा समन्वय आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर ही निवडणूक यशस्वीपणे लढवून कोल्हापूरच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!