मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शिवसेनेचे निवेदन
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव : २०१५ पासून अल्पमुदतीच्या कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन (Restructuring) झालेल्या तसेच २०१७ ते २०१९ या कालावधीतील कर्जमाफी योजनांमधून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी ठाम मागणी बाळासाहेबांची शिवसेना, मारेगाव तालुका प्रमुख विशाल मनोहर किन्हेकार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना–२०२६’ मधील विविध अटी व शर्तींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०१५ पासून थकीत असलेल्या, कर्ज पुनर्गठन झालेल्या तसेच यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमधून वगळलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांचा नव्या योजनेत समावेश करून त्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांवरील उर्वरित कर्ज भरण्याची अट शिथिल करून त्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले असून शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन व्यापक निर्णय घ्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड तसेच विधान परिषदेचे आमदार बच्चू कडू यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.यावेळी निवेदनावर तालुका प्रमुख विशाल मनोहर किन्हेकार, जीवन वि.काळे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मारेगाव, ब्रह्मदेव मारोती जुनगरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, विजय मेश्राम शहर प्रमुख मारेगाव,
संजय विनायक आवारी तालुका समन्वयक, राजू पुंडलिक कापसे मारेगाव,धनराज तात्याजी भट विभाग प्रमुख, प्रवीण बाबाराव गमे, शुभम विलास ठावरी, सुरेंद्र नारायण काकडे, दिगंबर शुक्राचार्य नावडे, अनिल राऊत विभाग प्रमुख,यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून, शासनाने सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय देणारा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.