सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव “रक्तदान हेच श्रेष्ठ दान, गुरुसेवा हीच खरी साधना” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत मारेगाव येथील साई मित्र परिवार यांच्यावतीने गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त सलग १७ व्या वर्षी रक्तदान महायज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा संगम असलेल्या या उपक्रमामुळे मारेगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या १७ वर्षांपासून साई मित्र परिवार रक्ताच्या कमतरतेमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबू नयेत, तसेच अपघातग्रस्तांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या सामाजिक जाणिवेतून सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करत आहे. या उपक्रमातून आजवर शेकडो रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळवून दिले असून, रक्तदानाबाबत समाजात व्यापक जनजागृतीही झाली आहे.
यंदाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जगन्नाथ महाराज मंदिर, मारेगाव येथे वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी, यवतमाळ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
त्यानंतर बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता महाप्रसाद तर सायंकाळी ५ वाजता जगन्नाथ महाराज मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. साईनामाच्या अखंड गजरात, भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात संपूर्ण मारेगाव भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
गुरुपौर्णिमा महोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून मानवतेची सेवा, सामाजिक एकोपा आणि रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारा प्रेरणादायी उपक्रम असल्याचे साई मित्र परिवाराने नमूद केले आहे.
या पवित्र सोहळ्यात मारेगाव व परिसरातील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदान देण्याच्या या पुण्यकार्यात सहभागी व्हावे, तसेच महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन साई मित्र परिवार, मारेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.