मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव, दि. २२ आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी व्यसनांच्या विळख्यातून बाहेर पडून सकारात्मक विचार, चांगली संगत आणि विधायक जीवनशैली स्वीकारणे काळाची गरज असल्याचा सूर कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित व्यसनमुक्ती अभियानात उमटला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात २२ ऑगस्ट रोजी या अभियानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी होते. प्रा. कु. संगिता आवारी व प्रा. अनुप कुरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वसंत गोरे सर आणि पुष्पा दीदी यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, हे युग स्पर्धा परीक्षांचे असून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून सकारात्मक, निरोगी आणि अर्थपूर्ण जीवन जगावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विशेषतः डिजिटल व्यसन आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व मानसिक एकाग्रतेवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबतही जागरूक करण्यात आले.

रंजना दीदी यांनी विद्यार्थ्यांसमोर यशस्वी जीवनाचे पाच महत्त्वाचे मंत्र ठेवले. सकारात्मक विचार, ज्येष्ठांचा आदर, व्यसनमुक्त जीवन, मोबाईलचा विधायक वापर आणि चांगली संगत या पंचसूत्रीचा स्वीकार केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी लता दीदी, सुरेखा दीदी यांच्यासह प्रा. अपर्णा मस्की, प्रा. विद्या सातपुते, प्रा. मनिषा बेतवार, प्रा. महादेव हेलगे, प्रा. चोपणे, प्रा. कळसकर, प्रा. झाडे, प्रा. कु. किर्ती एकरे व प्रा. अनुष्का ठाकरे आदी महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. तृप्ती विश्वंभरे यांनी केले, तर प्रा. कु. अश्विनी देवळकर यांनी आभार मानले. व्यसनमुक्तीचा संदेश आणि सकारात्मक जीवनाचा संकल्प देणाऱ्या या अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.