बातमी ऐका (Marathi Voice Reader)
छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या चांदगुडे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूच्या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध दावे आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, या व्हिडिओंमधून सत्याची खातरजमा न करता चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप करत मयत संगीता चांदगुडे यांच्या बहिणी पल्लवी पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भावूक व्हिडिओद्वारे युट्यूबर्स आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना आवाहन करत, कुटुंबाच्या दुःखात आणखी भर घालू नका, असे म्हटले आहे.
सोशल मीडियावर आयफोन किंवा मोबाईल न दिल्यामुळे मुलगा कुणालने आई-वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केले अशा आशयाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या दाव्यांवर पल्लवी पाटील यांनी आक्षेप घेतला. त्या म्हणाल्या, संगीता माझी मोठी बहीण, कुणाल माझा भाचा आणि मुरलीधर माझे मेव्हणे होते. या तिघांना गमावल्याचे दुःख आमचे कुटुंब भोगत आहे. आम्ही अंत्यविधीसाठी जात असताना मोबाईलवर एकापाठोपाठ एक व्हिडिओ पाहिले. त्यातील खोट्या गोष्टी पाहून आमचे काळीज तुटले.
घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी माहिती नसताना अनेकजण सोशल मीडियावर आपली मते मांडत असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही आम्हाला ओळखत नाही, घटनेमागचे सत्य तुम्हाला माहीत नाही. तरी केवळ व्ह्यूज आणि लाइक्स मिळवण्यासाठी चुकीच्या कथा का पसरवल्या जात आहेत? या व्हिडिओंमुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास होत आहे, असा सवाल त्यांनी केला. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचीही या प्रकारामुळे मानसिक अवस्था आणखी खालावत असल्याचे पल्लवी पाटील यांनी सांगितले. आमचे आई-वडील सत्तरीच्या पुढे आहेत. त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही गेले आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे त्यांचा त्रास आणखी वाढत आहे, असे सांगताना पल्लवी पाटील भावूक झाल्या.
आम्ही चार बहिणी होतो. मोठी बहीण गेल्याने आता आम्ही तीन बहिणी उरलो आहोत. चांदगुडे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या धक्क्यातून कसे सावरायचे, हेच आम्हाला कळत नाही. त्यामुळे मृत कुणाल, माझी बहीण संगीता आणि मेव्हणे मुरलीधर यांच्याबद्दल काहीही लिहिण्यापूर्वी किंवा व्हिडिओ बनवण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासावी, असे आवाहन त्यांनी केले. खवड्या डोंगर दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या कथा आणि दावे समोर येत असताना पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. त्यामुळे तपासातून अधिकृत माहिती समोर येण्यापूर्वी कोणतीही अप्रमाणित माहिती किंवा अफवा पसरवू नये, अशी विनंती पीडित कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.