मारेगावात कृषि विभागाची जनजागृती मोहीम
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव : शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान, कमी खर्चातील शेती पद्धती आणि पिकांचे प्रभावी व्यवस्थापन यांची माहिती देण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मारेगावने तालुकाभर जनजागृतीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. गावोगावी प्रशिक्षणाचे आयोजन करून एकात्मिक पिक व्यवस्थापन, कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापनासह सुरक्षित कीटकनाशक हाताळणी आणि सुरक्षित फवारणीचे धडे शेतकऱ्यांना दिले जात आहेत.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया), केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान अर्थात ‘कपास क्रांती’ तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख पिकांबाबत विशेष प्रशिक्षणातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
तालुक्यातील केगाव, हिवरी, मार्डी, गाडेगाव, दांडगाव, खैरगाव (बु.), किन्हाळा, रायपूर, मच्छिन्द्रा, पिसगाव, सराटी, डोर्ली, वरुड आणि करणवाडी या गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले असून, उर्वरित गावांमध्येही अशाच प्रशिक्षणांचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणादरम्यान तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी कृषि विभागाच्या विविध योजना आणि कमी खर्चातील नैसर्गिक शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी एकात्मिक कीड नियंत्रण व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. उपकृषी अधिकारी विजयकुमार पवार यांनी सुरक्षित फवारणीचे महत्त्व पटवून दिले.

तसेच समीर कोषटवार यांनी सोयाबीन पिकावरील किडींची माहिती दिली, तर मुकुंद लोणीकर यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत उपलब्ध विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली. धीरजकुमार देठे यांनी चिकट सापळ्यांच्या वापराबाबत मार्गदर्शन करून कमी खर्चात किडींचे नियंत्रण कसे करता येईल, याविषयी शेतकऱ्यांशी हितगुज साधले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व सहायक कृषि अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. निखिल पवार, तुषार मेश्राम, संगीता पेंदोर, सुरेखा मेश्राम, विनायक जुमनाके, अक्षय सोनूले, नकुल थोरात, विवेक पारधी, सनथ घोसळकर, सचिन आत्राम, ज्ञानेश्वर गाडगे, उदय नायक आणि सौदागर यादव यांच्यासह तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसन्न पारस्कर तसेच समूह सहायक श्यामल राऊत व वैदेही मलकापुरे यांनी उत्कृष्ट नियोजन करून प्रशिक्षण मोहीम यशस्वी केली.
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, शास्त्रीय पद्धतींचा अवलंब आणि सुरक्षित शेतीचा संदेश घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांनी आधुनिक पिक व्यवस्थापनाचे धडे घेतले. कृषि विभागाच्या या उपक्रमामुळे तालुक्यातील शेती अधिक शाश्वत, सुरक्षित आणि उत्पादनक्षम होण्यास निश्चितच हातभार लागणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.