मारेगांव तालुक्यातील चिंचाळा येथील घटना.
गजानन आसुटकर मारेगाव,
नाल्यातील पाण्यातून बैलबंडी घरी नेत असतांना त्या पाण्यात असलेल्या जीवंत कृषि पंप एल टी लाईनच्या विजेच्या धक्याने बैलजोडी जागीच ठार झाली. ही घटना तालुक्यातील चिंचाळा येथे आज दिनांक 14 मे 2023 रोज रविवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.
मारेगांव तालुक्यातील चिंचाळा येथे गावाला लागूनच नावडे यांच्या शेता जवळ जिवंत नाला आहे.येथील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जायला या नाल्याला ओलांडून जावे लागते.नेहमीप्रमाणे चारुदत्त दातारकर यांची बैलजोडी रामकिसन खंडरे यांनी आपल्या शेतातील कामासाठी शेतामध्ये नेली होती.

ते शेतातील काम आटोपून बैलबंडी दातारकर यांच्या शेतामध्ये नेत असतांना मध्ये असलेला नाला ओलांडत असतांना या नाल्यामध्ये जीवंत कृषि पंप एल टी लाईनच्या विद्युत तार नाल्यातील पाण्यात पडून होता.पडलेल्या ताराविषयीं कोणालाही माहिती नव्हती.यांची बैलबंडी पाण्यात जाताच बैलाला विद्युत तारेचा जोरदार झटका बसला.सुदैवाने खंडरे यांच्या पायातील चपलेने त्यांना वाचवले.
विजेचा झटका बसताच त्यांना बाजूला फेकून दिले त्यामुळे खंडरे यांचा जीव वाचला.परंतु बैलांना वाचवण्यात अपयश आले.शेतीचा हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असून दोन्ही बैलांच्या अशा मृत्यूने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शेती कशी करावयाची.हा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.सदर शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी पिडित शेतकऱ्याची मागणी आहे.
