बीज प्रक्रिया केल्या शिवाय खरीप पेरणी करू नये.

तालुका कृषी अधिकारी मारेगाव यांचे शेतकऱ्याला आवाहन.

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव:सध्या शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत आहेत.पण बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये,असे आवाहन जे आर राठोड उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा आणि तालुका कृषी अधिकारी मारेगाव विभागाकडून करण्यात आले आहे. सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास मोठे नुकसान होते.

त्यासाठी नंतर फवारणीचा खर्च वाढतो.त्यामुळे बीजप्रक्रिया करताना बुरशी नाशक थिओफेनेट मिथाइल ४५% + पायराक्लोस्ट्रोबिन ५% एफएस, थायोमेक्झाम ३४टक्के एफएस हे कीटकनाशक १०मिली प्रति किलो बियाण्यास लावावे.तसेच सोयाबीनसाठी नत्र स्थिर करण्यास व स्फूरद उपलब्ध करून देण्यासाठी रायझोबियम व पी.एस.बी. हे जैविक घटक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बियाण्यास लावावे. बीजप्रक्रिया म्हणजे एकप्रकारे लसीकरण आहे.

पेरणीवेळी वाफसा, यंत्र, ट्रॅक्टर आदींची जुळवाजुळव तसेच जास्त क्षेत्र असेल, तर गडबड होते.अशा वेळी अनेकजण बीजप्रक्रिया करण्यास टाळाटाळ करतात किंवा केली तरी ती योग्य प्रकारे होत नाही.त्यासाठी रासायनिक बीजप्रक्रिया ही पेरणीच्या आठ दिवस आधीच करून ठेवावी.बीजप्रक्रिया करताना एकेक पोत्याला औषध लावावे.

(जास्त बियाणे घेऊन एकत्र लावले, तर सगळीकडे चांगल्या प्रकारे व बियाण्याला औषध एकसारखे लागत नाही).

औषध मिसळताना हातात प्लॅस्टिक पिशवी घालावी,डोळ्यालागॉगल लावावा,तसेच तोंडाला मास्ककिंवा रुमाल बांधावा,असे आवाहन ही करण्यात आले आहे व जैविक बीजप्रक्रिया पेरणीच्या आधी १ ते २ तास करून बियाणे सावलीत सुकवावे.

तूर पिकाच्या बियाण्याला ‘ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.सोयाबीनसाठी काही संयुक्त औषधे उपलब्ध आहेत यात कीटकनाशक व बुरशीनाशक एकत्र आहे.याचा वापर प्रभावी व परिणामकारक ठरेल, अशी माहिती सुनील निकाळजे तालुका कृषी अधिकारी मारेगाव यांनी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!