काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत-पाक युद्धात भारताचा पराभव झाल्याचा दावा केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पत्रकारांनी याविषयी चव्हाण यांना छेडले असता त्यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगत माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले आहे. मी माफी मागणार नाही. मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. लोकसभेत सादर केलेल्या शांती विधेयक या अणु खासगीकरणाच्या विधेयकावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी माझ्यावर टीका केली जात आहे, असे ते म्हणालेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी काल पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकने भारताचा पराभव केल्याचा धक्कादायक दावा केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 मे रोजी अर्ध्या तासातच आपली काही विमाने पाडण्यात आली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यासह देशात एकच खळबळ माजली होती. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. विशेषतः भाजप नेत्यांनी त्यांच्या माफीची मागणी करण्यात आली आहे. मी का माफी मागावी? – पृथ्वीराज चव्हाण पत्रकारांनी याविषयी बुधवारी पुन्हा त्यांना छेडले असता त्यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. तसेच या प्रकरणी माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही ठणकावून सांगितले. ते म्हणाले, मी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मी का माफी मागावी? सोमवारी लोकसभेत शांती विधेयक हे अणु खासगीकरणाचे विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी माझ्या विधानावर टीका केली जात आहे. मी माफी मागणार नाही, असे ते म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 मे रोजी अर्ध्या तासातच आपली काही विमाने पाडण्यात आली. हे लोकांनी मान्य करो किंवा न करो, पण हेच सत्य आहे. पाकने भारताचा पाडाव केला हेच खरे आहे. पहिल्या दिवशी भारताची विमाने पाडल्यानंतर भारतातील लष्कराची सर्व विमाने उतरवण्यात आली. त्या दिवशी कुठेही विमाने उडली नाही. ग्वाल्हेर, भटिंडा असेल किंवा सरसा येथील हवाई तळावरूनही एकही विमान झेपावले नाही.
ते असेही म्हणाले होते की, यापुढच्या काळात युद्ध हे हवाई युद्ध होणार आहेत. अशावेळी इतक्या मोठ्या सैन्य दलाचा उपयोग होणार नाही. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पाहिले की, लष्कराची एक किलोमीटरचीही हालचाल झाली नाही. दोन ते तीन दिवस चाललेल्या या युद्धात केवळ हवाई हल्ले आणि क्षेपणास्त्र डागण्यात आली. भविष्यातही अशाच प्रकारे युद्ध लढली जातील. अशावेळी 12 लाखांचे सैन्य दल आपण बाळगावे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये काय झाले? याची चौकशी केली जावी. तसेच ऑपरेशन सिंदूरची खरी माहिती बाहेर यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.
