बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करा- धाडगे:श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील गुणवंतांचा केला गौरव

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात केवळ शैक्षणिक प्रगती पुरेशी नसून विद्यार्थ्यांचे शरीर, मन, मनगट आणि मस्तक तंदुरुस्त असणे तितकेच आवश्यक आहे. अभ्यासासोबतच खेळ, कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा समतोल साधणारा विद्यार्थीच भविष्यात यशस्वी ठरू शकतो, असे प्रतिपादन पुणे येथील सहाय्यक अभियंता राजेंद्र धाडगे यांनी केले. श्री समर्थ विद्यामंदिर माध्यमिक विभागात इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे चेअरमन स्वप्निल कुलकर्णी होते. संस्थेचे सचिव सुरेश क्षीरसागर, संचालक दीपक ओहळ, संध्या कुलकर्णी, प्राथमिकचे मुख्याध्यापक अजय महाजन, माध्यमिकचे मुख्याध्यापक सुनील कानडे उपस्थित होते. धाडगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडत असली तरी मानवी मूल्ये, सर्जनशीलता, मेहनत आणि जिद्द यांना पर्याय नाही. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण असतात. पालकांनी आपल्या पाल्यांची आवड, क्षमता आणि कौशल्ये ओळखून त्यांना योग्य क्षेत्र निवडण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. केवळ गुणांच्या स्पर्धेत अडकून न पडता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. चेअरमन स्वप्निल कुलकर्णी म्हणाले, सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळते. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशावर समाधान न मानता भविष्यातील मोठी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहील. मुख्याध्यापक सुनील कानडे यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाच्या वाटचालीचा आलेख मांडला. यावेळी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन श्रद्धा नागरगोजे यांनी केले तर आभार श्रद्धा शिरोडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक सतीश टकले, रंगनाथ देशमुख, मोहिनी कुलकर्णी, योगिता कुलकर्णी, जयश्री काळे, राजेंद्र महाजन, भरत कुलकर्णी, अमोल परदेशी आदींनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे : कुलकर्णी चेअरमन कुलकर्णी म्हणाले, सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळते. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या यशावर समाधान न मानता भविष्यातील मोठी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमीच कटिबद्ध राहील.

Leave a Comment

error: Content is protected !!