शिवतीर्थावरून पुन्हा वाद:संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – एकनाथ शिंदेंचा पक्ष अमित शहांचे ‘टेस्ट ट्यूब बेबी’

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगता सभेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार शब्दांत टीका केली. शिवतीर्थावर सांगता सभा करण्याचा अधिकार फक्त शिवसेनेलाच असल्याचे सांगत राऊत म्हणाले की, आतापर्यंत शिवतीर्थावर निवडणुकीच्या सुरुवातीची आणि सांगता सभा केवळ शिवसेनाच करत आली आहे. त्यामुळे आता महापालिकेची सांगता सभा करण्यासाठी काही जणांना बुडबुडे, येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाचा शिवतीर्थाशी नेमका काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित केला. तुमचा पक्ष अमित शहांनी ताब्यात घेतला आहे. तुम्ही अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी आहात, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदेंवर आणि त्यांच्या गटावर टीका केली. शिवसेनेच्या परंपरा, इतिहास आणि संघर्षाचा वारसा शिवतीर्थाशी जोडलेला असून तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात वादाची ठिणगी पडली असून, आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत स्पष्ट संकेत दिले असून, ज्या घोषणेची सर्वांना उत्सुकता आहे, ती लवकरच केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, पुणे आणि नाशिक या महत्त्वाच्या महापालिकांमध्येही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सलग बैठकांमध्ये सहभागी होत असून, लवकरच सर्व मुद्द्यांवर एकमत होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना युतीतील अंतर्गत वातावरणाबाबतही भाष्य केले. आमच्यात कोणताही विसंवाद नाही. महायुतीमध्ये जसा गोंधळ दिसतो, तसा प्रकार आमच्याकडे नाही. आमचं घर दोघांचं आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधारी आघाडीवर टीका केली. काँग्रेस सध्या स्वबळावर लढण्याच्या भूमिकेत असल्याचे त्यांनी नमूद केले असले, तरी भविष्यात शरद पवार यांच्याशी चर्चा होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र शिवसेना आणि मनसे हेच या आघाडीचे मुख्य स्तंभ असतील, आणि ही आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर खरे आव्हान उभे करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईला जागं करण्याचं काम ही युती करेल, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर दिसणार का, हा प्रश्नही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. युतीची घोषणा झाल्यानंतर शिवाजी पार्कवर भव्य सभा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं जाईल, अशी चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे याआधीही अनेक वेळा एकत्र आले आहेत. डोममधील पहिल्या कार्यक्रमापासून ते एकमेकांच्या घरी जाणे, चर्चा करणे हे सर्व घडले आहे. त्यामुळे एकत्र दिसतील का, हा प्रश्नच उरत नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे युतीची औपचारिक घोषणा आता केवळ वेळेची बाब असल्याचे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!