मोदीजी कोणत्याही रात्री काहीही बंद करू शकतात, असे म्हटले आहे. तसेच मोदींनी समुद्रात उडी मारायला सांगितली तरी आम्ही मारू, असे विधान भाजप नेते व आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे. देशातील सद्यपरिस्थितीवरून विरोधकांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यात भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता प्रमोद जठार यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. प्रमोद जठार कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले, आमचा नेता मजबूत आहे. देशातील सरकार मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी रहा आणि ते जे सांगतील ते ऐका, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच मोदीजी कोणत्याही रात्री काहीही बंद करू शकतात. तसेच मोदींनी समुद्रात जरी उडी मारायला सांगितली तरी आम्ही मारू, असे विधान त्यांनी केले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. प्रमोद जठार यांनी केलेल्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सोशल मीडियावर देखील त्यांच्या विधानावर विविध प्रतिक्रिया उमटत असून विरोधकांनी यावरून टोलेबाजी सुरू केली आहे. कोण आहेत प्रमोद जठार? कोकणातील भाजपचा एक प्रमुख चेहरा असलेले आणि पक्षात सातत्याने सक्रिय असणारे नेते प्रमोद जठार यांची नुकतीच भाजपकडून विधान परिषदेवर निवड झाली आहे. यापूर्वी, 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा अवघ्या 32 मतांनी निसटता पराभव करून लक्षवेधी विजय मिळवला होता. त्यानंतर भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले जठार सध्या महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय पक्ष संघटनेने त्यांच्याकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली असून, कोकणातील नाणार रिफायनरीसारख्या औद्योगिक प्रकल्पांबाबतही त्यांनी यापूर्वी आपली अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली आहे.