बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील ग्रामीण रस्त्यालगत असलेल्या नैसर्गिक व वृक्षारोपण केलेल्या मौल्यवान सरकारी झाडांना आग लावून नष्ट करण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. उन्हाळ्यात बाळापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये शेतकरी शेतधुरे जाळत असताना, लगतची सरकारी झाडेही पेट घेत आहेत. काही ठिकाणी जाणीवपूर्वक झाडे पेटवली जात असल्याचा आरोप करत अनंतराव फाटे, जयश्री फाटे, अनिल गावंडे आणि गजानन थोरात या पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केला आहे. झाडे ही केवळ सावली देत नाहीत, तर ती जमिनीची धूप रोखतात आणि उन्हाळ्यात तापमानाचा पारा नियंत्रित ठेवतात. आगीमुळे अनेक पक्ष्यांची घरटी आणि जैवविविधता नष्ट होत आहे.नोटीस न देता, महसूल व वन विभागाने संयुक्त पंचनामे करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, तसेच तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली.