नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यात महायुतीने विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. परळीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि रिपाइंच्या महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, अंबाजोगाई आणि गेवराईतही भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. या विजयानंतर बोलताना आमदार धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी जनतेचे आभार मानत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. परळीतील विजयावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि रिपाइंच्या महायुतीला आज कौल दिलाय. एखादी दुसरी जागा सोडली, तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आल्या आहेत. अपक्ष उमेदवार देखील महायुतीचेच आहेत. त्यामुळे फक्त एमआयएम आणि पंजा दोन जागांवर पुढे असल्याचे कळतंय. पण जवळजवळ सर्व जागांवर महायुतीने ऐतिहासिक मतांनी विजय मिळवला. नगराध्यक्ष सुद्धा निवडून येतील. बदनाम करणाऱ्यांना जनतेची चपराक परळीकरांचे ऋण व्यक्त करतो, त्यांनी अभूतपूर्व विजय दिला. जवळजवळ महायुतीचे सर्वच उमेदवार निवडूण आले. आता तरी विरोधकांनी आपली जागा काय, लायकी काय हे बघितले पाहिजे. प्रचारावेळी ज्यांनी माझ्यावर टीका केली, माझ्या परळीला बदनाम केले. याचे उत्तर मी त्यावेळी दोन तारखेला म्हटलो होतो. पण निकाल लांबला आणि आज 21 तारखेला परळीच्या जनतेकडून आम्हाला बदनाम करणाऱ्यांच्या तोंडात ही चपराक आहे, असे धनंजय मुंडे म्हणालेत. परळीत खासदार तळ ठोकून राहिले, तरी परळीच्या मायबाप जनतेला काही फरक पडत नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना लगावला. मंत्रीपदाच्या लालसेसाठी राजकारणात आलो नाही एखाद्या गावाला, शहराला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी जो डाव टाकला तो परळीकरांनी उधळून लावला. मी कधीही मंत्रीपदाच्या लालसेसाठी राजकारणात आलेलो नाही, सर्वसामान्य माणसाच्या मनात स्थान निर्माण करणे तेच माझ्यासाठी महत्वाचे आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. अंबाजोगाईत पंकजा मुंडेंची ऐतिहासिक ‘एन्ट्री’ भाजपच्या विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील निकालांवर समाधान व्यक्त केले. “बीडच्या जनतेने लोकसभा निवडणुकीतही आम्हाला मोठे प्रेम दिले होते. अगदी निसटता पराभव झाला. यंदा परळीत आम्ही राष्ट्रवादीसोबत युती केली, तर इतरत्र स्वतंत्र लढलो. गेवराई आम्ही राखली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंबाजोगाईत आम्ही कधीही न मिळवलेला विजय संपादन केला आहे. धारूरमध्ये आमचा निसटता पराभव झाला असला, तरी कार्यकर्त्यांनी सत्तेत नसतानाही दिलेली झुंज कौतुकास्पद आहे,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
भाजप पुन्हा एकदा ‘नंबर वन’ भाजपच्या यशावर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “भाजप देशात आणि राज्यात एक नंबरचा पक्ष आहेच, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही तोच निकाल लागला आहे. पक्ष एक नंबरचा असल्यामुळे विकासही एक नंबरचाच होईल. जनतेच्या वर्तमानासह भविष्य सुरक्षित करण्यासाठी भाजपचे योगदान आता गावाखेड्यापर्यंत पोहोचणार आहे. मी विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही; विजय नम्रपणे स्वीकारते आणि पराभव धैर्याने पचवते, हाच माझा आजवरचा प्रवास आहे.”
