कोकणकरांचे आयुष्य संकटात टाकणारी कंपनी रत्नागिरीत:काँग्रेस नेत्याने शेअर केला धडकी भरवणारा VIDEO; स्पष्टीकरणाची मागणी

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात जनतेचे आयुष्य संकटात टाकणारी एक कंपनी स्थापन होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यात या कंपनीच्या दुष्परिणामांची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. ही कंपनी कोकणात उभी राहिली तर तेथील जनतेचे प्राण संकटात सापडतील, असा दावा त्यांनी केला आहे. सचिन सावंत आपल्या एका पोस्टमध्ये म्हणतात, हे प्रचंड खतरनाक आहे. कोकणातील जनतेचे आयुष्य संपविण्याचा हा घाट आहे. सदर कंपनीला परवानगी कशी मिळाली? याची चौकशी आणि आता ही कंपनी जे उत्पादन काढते त्याची तपासणी होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री यावर उत्तर देतील ही अपेक्षा आहे. आत्ता पाहू काय आहे धडकी भरवणाऱ्या व्हिडिओत? या व्हिडिओत नमूद करण्यात आले आहे की, इटलीचे विषय आता भारतात तयार होणार. इटलीत विकेन्झा नामक एक जागा आहे. तिथे एक केमिकल तयार करणारी फॅक्ट्री होती. मिटनी असे तिचे नाव होते. या कारखान्यालगत राहणाऱ्या नागरिकांनी काही विचित्र आजार होऊ लागले. रुग्ण फार मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर त्याची चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या रक्तानातून पीएफए केमिकल आढळले. हे एक असे केमिकल आहे ज्याला फॉरेव्हर केमिकल म्हटले जाते. का, तर हे केमिकल तयार झाल्यानंतर कधीही नष्ट करता येत नाही. मग हे केमिकल तुमच्या शरीरात असो, पाण्यात असो किंवा जमिनीत असो. त्याने काहीही फरक पडत नाही. त्यामुळे हे केमिकल या लोकांच्या शरीरात गेले कसे? यावर शोध सुरू झाला. त्यात असे निदर्शनास आले की, हे केमिकल कारखान्याने डिस्चार्ज केले तेव्हा ते तेथील पिण्याच्या पाण्यात मिसळले. इटलीच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मानवी शरीरात हे केमिकल प्रति मिलिग्राम 8 नॅनोग्रॅमपेक्षा जास्त असता कामा नये. पण या कारखान्याच्या एका कामगाराच्या शरीरात ते तब्बल 91 हजार नॅनोग्रॅम एवढे आढळून आले. त्यानंतर झालेल्या तपासणीत या केमिकलचा फटका तब्बल साडेतीन लाख लोकांना बसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर इटली सरकारने कारवाई करत हा कारखाना बंद केला. तसेच त्याला जबाबदार लोकांनाही तुरुंगात डांबले. यामुळे प्रकरण संपले असे तुम्हाला वाटत असेल, पण नाही. ही फॅक्ट्री बंद झाल्यानंतर जे झाले ते ऐकूण तुम्ही थक्क व्हाल. कारखाना बंद झाल्यानंतर तेथील यंत्रसामग्रीचा लिलाव करण्यात आला. त्यात केवळ एका कंपनीने सहभाग घेतला. विवा लाईफसायन्सेस असे या कंपनीचे नाव आहे. त्यानंतर ही यंत्रसामग्री पॅक करून कंटेनरमध्ये भरून मुंबईत आणण्यात आली. ही विवा कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतीय कंपनीची उपकंपनी आहे. ही यंत्रसामग्री रत्नागिरी जिल्ह्यात लावण्यात येणार आहे. स्वतः कंपनीनेच ही माहिती दिली आहे. तसेच रत्नागिरीतील कंपनीत इटलीत तयार होणारे फॉरेव्हर केमिकलच तयार करणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. गंभीर गोष्ट म्हणजे भारतात पीएफएला नियंत्रित करणारा कायदाच नाही. आता तुम्हीच विचार करा. युरोपातील तब्बल साडेतीन लाख लोकांना आजारी पाडणाऱ्या कारखान्याला बंद करण्यात आले. पण तोच कारखाना आता शांतपणे भारतात आला. एक असे रसायन तयार करण्यासाठी ज्याला रेग्युलेट करणारा कायदाच भारतात नाही. असे का? तर आपल्या जिवाला काही किंमत थोडीच आहे, असे या व्हिडिओत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!