वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना एक क्षणभरही मंत्रिपदी राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला आहे. एखाद्या व्यक्तीला 2 वर्षांची शिक्षा झाली की त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेचेही सदस्य राहता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे ते म्हणालेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटानेही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. नाशिकच्या एका कनिष्ठ कोर्टाने शासकीय फ्लॅट बोगस दस्तऐवजाच्या आधारावर लाटल्याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेवर काल सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे कोकाटे यांच्या विधानसभा सदस्यत्वावर पर्यायाने मंत्रिपदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. कायद्याचा अपमान होऊ देऊ नका ते आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, एकदा तुम्हाला 2 वर्षांची शिक्षा झाली की, सर्वप्रथम तुमचा मताचा अधिकार सस्पेन्ड होतो. कायदा असे म्हणतो की, ज्याला 2 वर्षांची शिक्षा झालेली आहे, त्याला आमदार, खासदार किंवा नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद याचे सदस्य राहता येत नाही. तेव्हा कायद्याचा अपमान होणार नाही याची दक्षता देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. त्यांचीही एक केस नागपूरच्या कोर्टात सुरू आहे. तेव्हा त्यांनी या दोन्ही केसेस लिंक करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. वंचित मुंबईत काँग्रेसशी आघाडी करणार? मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत आघाडी करणार का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना केला. त्यावर ते म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची कन्या इंग्लंडला असते. मी त्यांना ओळखतो. त्या इंग्लंडला शिकण्यासाठी गेल्या आहेत. त्या त्यांच्या एका विषयासंदर्भात माझ्याशी चर्चा करतात. त्यामुळे त्या काल माझ्याशी त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आल्या होत्या. माझी त्यांच्याशी चर्चा झाली. माझे मीडियाला आवाहन आहे की, काही गोष्टी या स्पेक्युलेशनच्या बाहेर ठेवल्या तर चांगले राहील असे मी मानतो. त्यामुळे त्या सुद्धा इंग्लंडमध्ये विद्यार्थिनी आहेत. त्या पुन्हा तिकडे जाणार आहेत. माध्यमांनी या भेटीला राजकीय रंग देऊ नये अशी माझी विनंती आहे, असे ते म्हणाले. हा संविधानद्रोह हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधानपरिषदेतील माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी सरकारवर संविधानद्रोह केल्याचा आरोप केला आहे. कायद्यासमोर सर्व समान आहेत, हे जर या सरकारला मान्य असेल तर सरकारने माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा. सरकारने यापूर्वी जो न्याय राहुल गांधी यांच्या खासदारकी आणि सुनील केदार यांच्या आमदारकीसाठी लावला, तोच न्याय माणिकराव कोकाटे यांना लागू व्हायला हवा. सरकार निर्लज्जपणे हायकोर्टाच्य कामकाजाची वाट पाहत असेल तर हा संविधान द्रोह आहे, हे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्वछ आहे, असे दानवे म्हणालेत.