केडीएमसीमध्ये महायुतीला तडा?:एकनाथ शिंदे म्हणतात ‘एकत्र’, तर रवींद्र चव्हाणांचा ‘स्वबळा’चा नारा; राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली, तरी कल्याण-डोंबिवलीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर बोलताना रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना आक्रमक पवित्रा घेण्याचे निर्देश दिले. ज्याप्रमाणे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, तसेच सरकार आपल्याला महापालिकेतही आणायचे आहे. त्यामुळे यावेळेस जो उमेदवार ‘कमळ’ चिन्हावर उभा राहील, त्यालाच मतदान करा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. विशेष म्हणजे, त्यांनी हे विधान विचारपूर्वक केल्याचे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेही स्पष्ट केले. 122 जागांवर भाजपचा डोळा? कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या 10-10 हजार कार्यकर्त्यांमधून केवळ 122 निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. या विधानाचा अर्थ भाजप सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार, असाच काढला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड वगळता सर्वत्र महायुती एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र चव्हाणांच्या या भूमिकेमुळे ‘केडीएमसी’मध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ग्रामीण भागात चांगली कामगिरी केली असली, तरी त्यांच्या बालेकिल्ल्याला लागून असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. बदलापूर आणि अंबरनाथमधील शिवसेनेचा हा पराभव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. याच यशाच्या जोरावर आता भाजपने कल्याण-डोंबिवलीतही शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला सारून स्वबळाची तयारी सुरू केली आहे. खासदार श्रीकांत शिंदेंची अडचण वाढणार? कल्याण-डोंबिवली हा भाग खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्याने या ठिकाणच्या महापालिका निवडणुकीत भाजपची स्वबळाची भूमिका त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. केंद्रात आणि राज्यात ‘डबल इंजिन’ सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थेतही 100 टक्के भाजपचाच विचार हवा, असा आग्रह रवींद्र चव्हाण धरत असल्याने महायुतीमधील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!