शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट, मनसेची युती 130 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी आपणही या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे किशोरी पेडणेकर या शिवसेना – मनसे युतीच्या पहिल्या उमेदवार ठरू शकतात. उद्धव व राज ठाकरे यांनी आज आपल्या बहुप्रतिक्षित युतीची घोषणा केली. यावेळी त्यांनी मुंबई किंवा महापालिकेच्या निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्यावर कोणतेही भाष्य केले नाही. पण हे जागावाटप दोन्ही पक्षांसाठी सन्मानजनक राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी बोलताना मुंबईच्या माजी महापौर तथा ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे बंधूंची युती मुंबईत 130 किंवा त्याहून अधिक जागा जिंकेल असा दावा केला. काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर? किशोरी पेडणेकर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, शिवसेना व मनसेची युती मुंबईत 130 किंवा त्याहून अधिक जागा जिंकेल. मला स्वतःलाही या निवडणुकीत उमेदवारी मिळेल. त्यामुळे मी माझ्या वॉर्डातून 100 टक्के निवडणूक लढवेन. भाजपवाले आमच्यावर आरोप करत आहेत. पण त्यांनी आमच्यावर केव्हा आरोप केले नाहीत. ते नेहमीच करतात. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्ही काय काम केले हे मुंबईकरांना माहिती आहे. मी स्वतः रणांगणात असेल. उल्लेखनीय बाब म्हणजे पेडणेकर यांनी 2017 च्या मुंबई निवडणुकीत दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झाली. आता त्यांनी पुन्हा एकदा आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काय असेल ठाकरे बंधूंचा जागावाटपाचा फॉर्म्युला? सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे बंधू जागावाटपाच्या मुद्यावर सन्मानकारक तोडगा काढतील. त्यात ठाकरे गट 140 ते 150 जागांवर निवडणूक लढवेल. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 60 ते 70 जागांवर निवडणूक लढवण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरे बंधूंसोबत येण्याचा निर्णय घेतला तर या जागांमध्ये काहीसा बदल होईल. त्यात उद्धव ठाकरेंचा पक्ष आपल्या वाट्याच्या 15 ते 20 जागा शरद पवार गटाला सोडेल. यामुळे मनसेच्या कोट्यातील एकही जागा कमी होणार नाही. महापालिकेची 15 जानेवाला निवडणूक उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्रात येत्या 15 जानेवारीला मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
