भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मी ठाकरे बंधूंसारखा कागदी वाघ नाही. मी खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. आताच्या निवडणुकीनंतर ठाकरेंचे पक्ष अस्तित्वातही राहणार नाहीत, असे ते म्हणालेत. ठाकरे गट व मनसेची बुधवारी बहुप्रतिक्षित युती झाली. राज व उद्धव ठाकरे यांनी एका हॉटेलमध्ये या युतीची घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी या युतीवर रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेविषयी प्रश्न केला होता. त्यावर राज ठाकरे यांनी उत्तरे देवाला दिली जातात, दानवांना नाही, असे म्हणत दानवेंना टोला हाणला होता. रावसाहेब दानवेंनी गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राज यांच्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ठाकरेंचा एकेक शिलेदार त्यांना सोडून जात आहे रावसाहेब दानवे म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा आम्हाला आनंदच आहे. आता दोघांनी पुढच्या काळात पुन्हा विभक्त होण्याची पाळी येऊ नये असे वागू नये. 2019 व 2024 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी अनैसर्गिक युती केली. ते भाजपला सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. त्यांचे अडीच वर्षांचे सरकार या राज्यातील जनतेला आवडले नाही. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यांचा एकेक शिलेदार त्यांना सोडून गेला. एकीकडे त्यांच्या युतीची पत्रकार परिषद सुरू होती आणि दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून जात होते. माझा मुलगा तिसऱ्यांदा आमदार झाला उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवेंना आता भाजपत कुणीही विचारत नसल्याचीही टीका केली होती. यावर दानवे म्हणाले, भाजपने मला सभापती, आमदार, खासदार, दोनदा केंद्रात मंत्री व राज्यात पक्षाचा अध्यक्ष केले. मला पक्षात कुणी विचारत नसते तर असे केले असते का? माझा मुलगा तिसऱ्यांदा आमदार झाला. उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरखा घालून, शेपटी खाली घालून मी विधान परिषदेत गेलो नाही. मी खरा वाघ आहे. त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. मी म्हणालो हे पक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाहीत. कारण, प्रचारासाठी फिरताना मला ते समजत होते. ते आता हरले तर कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत राहून काही अस्तित्वच राहणार नाही. म्हणून त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांना सोडून जातील. दोन्ही भावांवर एकदाट टीका नको. त्यांचे एका होऊन जाऊ द्या, असेही दानवे यावेळी बोलताना म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे? ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. ही उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक आहे. त्यानंतर त्यांच्या पक्षात कार्यकर्तेच राहणार नाहीत असे लोक म्हणत आहेत. त्यावर राज ठाकरे म्हणाले, लोक म्हणजे कोण? त्यावर पत्रकाराने भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे नाव घेतले. त्यावर राज ठाकरे हे आपले बंधू उद्धव यांच्या मदतीला धावून आले आणि म्हणाले, मला असे वाटते उत्तरे देवाला द्यावीत, दानवांना नाही.
