बातमी ऐका (Marathi Voice Reader)
मनसेला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रकाश महाजनांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने मला 3 महिने ताटकळत ठेवले. त्यामुळे भाजपला आता मुंडे, महाजनांची गरज उरली नसल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत. प्रकाश महाजन यांनी गत आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष प्रवेशानंतर लगेचच त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपवरही शरसंधान साधले आहे. ते म्हणाले, मी भाजपमध्ये गेलो नाही. कारण, त्यांनी मला तब्बल 3 महिने ताटकळत ठेवले. मी त्यांची प्रवेश परीक्षा पास झालो नाही. पण ज्यांनी भाजपवर टीका केली, ते सर्वजण आज भाजपमध्ये आहेत. दिनकर पाटील भाजपवर बोलले, ते आज भाजपत आहेत. भाजपच्या घराला दार नाही, पण पहारेकरी आहेत हे सांगण्यासाठी मी सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला. पण त्यांनी तो उचलला नाही. मी तीन महिने वाट पाहिली. कारण, मला हिंदुत्त्वावर काम करायचे होते. ठाकरे बंधूंवरही साधला निशाणा प्रकाश महाजन यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ठाकरे बंधूंनी केव्हाच हिंदुत्त्व सोडले. त्यांना केवळ मुंबईतील आपले अस्तित्व टिकवायचे आहे. मोठ्या लोकांनी निष्ठा बदलली की विचार, देशहित असे म्हटले जाते. उलट गरिबांवर शेण खाल्ल्याचा आरोप होतो. मी 5 वर्षे मनसेत होतो. तिथे तपश्चर्या केली. आता माझ्यावर पैशांसाठी पक्ष सोडल्याची टीका करणारे लोक जनावरांच्या बाजारात दलाली करतात. आमच्यावर विठ्ठलाचे प्रेम नव्हते. विठ्ठलाच्या नातवाचे काम करायचे. मी म्हणालो होतो विठ्ठल बदलणार नाही, पण विठ्ठलाने लक्ष दिले पाहिजे की नाही? चंदूमामा सोडा, रशीद मामू आला छोट्या कार्यकर्त्याने निष्ठा सोडली की त्यांना गद्दार म्हटले जाते. मी आता अस्तित्व आहे तोपर्यंत शिवसेनेत राहणार. मी दोन्ही भावांना एकत्र येण्याचे आवाहन केले. पण ते मराठी माणसांपासून दूर जाताना दिसले. ते मला खटकले. चंदूमामा सोडा, रशीद मामू आला. पण ते राज ठाकरे यांना खटकले नाही. आता एकत्र आल्यानंतर अनेकजण आठवत आहेत. शिवेसना – मनसे युतीत मनसेला ज्या जागा पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे अनेकजण नाराज झालेत. ठाकरे गट व मनसेची युती झाली तेव्हा बाळा नांदगावकर कुठे गेले होते? असा सवालही प्रकाश महाजन यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नामुळे बाळा नांदगावकर मनसेत नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.