बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आज एक खळबळजनक ‘ट्विस्ट’ पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये युती होईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, दोन्ही पक्षांत जागावाटपावरून बिनसले आहे. परिणामी, शिंदे गटाने भाजपला ‘जय महाराष्ट्र’ करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती जाहीर केली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये 51-51 जागांचा समान फॉर्म्युला निश्चित झाला आहे. या नव्या प्रयोगामुळे सोलापूरच्या राजकारणात ‘महायुती’मध्येच मोठी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असून, निवडणुकीचे सर्व गणिते बदलली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी या युतीबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, “आम्ही भाजपसोबत सन्मानजनक युतीसाठी सकारात्मक होतो. आम्ही 40 जागांची मागणी केली होती, मात्र भाजपने आम्हाला केवळ 8 जागा देण्याचे कबूल केले. आम्ही किमान २६ जागांवर ठाम होतो, परंतु भाजपने त्यापुढे चर्चा करण्यास रस दाखवला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी (अजित पवार गट) हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.” नव्या युतीचा ‘विकास’ मंत्र या नव्या युतीमागे सत्तेचे गणितही तितकेच भक्कम असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. “राज्याचे नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि अर्थखाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे. त्यामुळे सोलापूरच्या विकासासाठी आम्हाला निधीची कधीच कमतरता भासणार नाही. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत,” असे त्यांनी नमूद केले. अशी झाली युतीची खलबते सोलापूर महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात बोलणी फिसकटल्याने शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून मोठी अस्वस्थता होती. दुसरीकडे, अजित पवार गटानेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, काल (२७ डिसेंबर) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर चक्र वेगाने फिरली. भरणे आणि सिद्धराम म्हेत्रे यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीत या युतीवर शिक्कामोर्तब झाले आणि आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. सोलापुरात तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे दरम्यान, भाजपने आधीच स्वबळाची तयारी केलेली होती. त्यामुळे शिंदे गटाला कमी जागा देण्यावर ठाम होते, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे अखेर शिंदे गट आणि राष्ट्रवादी या दोन मित्र पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या आघाडीमुळे सोलापुरात आता तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजपला एकाकी पाडण्याच्या या खेळीचा फायदा कोणाला होतो आणि सोलापूरकर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल. हे ही वाचा… मनपा निवडणुकीसाठी इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची हत्या:सीसीटीव्हीत तीन संशयित कैद, सोलापुरातील धक्कादायक घटना सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या राजकीय धामधुमीत शहरात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असतानाच, लष्कर परिसरात एका इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. अयुब सय्यद असे हत्या झालेल्या उमेदवाराचे नाव असून ते प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी करत होते. सविस्तर वाचा…