छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती तुटल्याची घोषणा होताच काही तासांतच राजकीय वातावरण कमालीचे तापले असून भाजपने शिंदेसेनेवर जोरदार पलटवार करत थेट आरोपांची तोफ डागली आहे. शहराच्या विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून शिंदेसेनेने घरातील मंडळींच्या राजकीय पुनर्वसनालाच प्राधान्य दिले, त्यामुळेच युती जाणीवपूर्वक तोडण्यात आली, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार भागवत कराड यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे आता युतीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून शहरात थेट आणि कट्टर राजकीय संघर्ष अटळ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपचे नेते अतुल सावे यांनी युती तुटण्यामागील पडद्यामागची सविस्तर माहिती उघड करताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी 37 जागांचा फॉर्म्युला अंतिम झाला होता. या फॉर्म्युलावर दोन्ही पक्षांमध्ये शिक्कामोर्तबही झाले होते. मात्र, त्यानंतर स्थानिक पातळीवर शिंदेसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने नव्या मागण्या पुढे येत राहिल्या. एकदा ठरलेल्या जागांवर पुन्हा दावा केला जाऊ लागला, विद्यमान भाजप नगरसेवक असलेल्या प्रभागांवरही शिंदेसेनेने हक्क सांगितला. वैयक्तिक हितसंबंध, नातेवाईकांचे समायोजन आणि विशिष्ट मंडळींच्या पुनर्वसनासाठी प्रस्तावांमध्ये वारंवार बदल सुचवले गेले, असा आरोप सावे यांनी केला. सावे पुढे म्हणाले की, भाजपने युती टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लवचिकता दाखवली. अनेक ठिकाणी तडजोडीची भूमिका घेतली, विकासाच्या दृष्टीने एकत्र लढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदेसेनेच्या नेत्यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच गेल्या. आम्ही शहराच्या भविष्यासाठी निर्णय घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण समोरच्यांना समाधान मिळत नव्हते. मागण्या पूर्ण करूनही त्यांची भूक भागत नव्हती, असा थेट आरोप करत सावे यांनी युती तुटण्याची संपूर्ण जबाबदारी शिंदेसेनेवर ढकलली. या पार्श्वभूमीवर महायुती तोडण्याचा निर्णय हा अचानक घेतलेला नसून, शिंदेसेनेनेच तो घडवून आणल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार भागवत कराड यांनी शिंदेसेनेतील अंतर्गत विसंवादावर बोट ठेवत आणखी गंभीर चित्र समोर आणले. शिंदेसेनेत पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष हे चारही प्रमुख नेते कधीही एका भूमिकेवर एकत्र आले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. चार नेते आणि चार वेगवेगळ्या दिशा, अशी स्थिती कायम राहिली. एक नेता काही सांगायचा, तर दुसरा त्याच्या उलट भूमिका घ्यायचा. या अंतर्गत मतभेदांमुळेच युतीबाबत स्पष्ट निर्णय होऊ शकला नाही आणि अखेर त्याचा बळी महायुतीला द्यावा लागला, असे कराड यांनी स्पष्ट केले. शिंदेसेनेच्या अंतर्गत गोंधळाचा फटका संपूर्ण राजकीय समीकरणांना बसल्याचेही त्यांनी नमूद केले. विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाण्याचा निर्धार केला या घडामोडींमुळे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत युतीचा अध्याय पूर्णपणे संपुष्टात आला आहे. पूर्वी ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा होती, तिथे आता थेट, आक्रमक आणि कट्टर संघर्ष पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. भाजपने विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाण्याचा निर्धार केला असून मतदार हुशार असून तो विकासाच्या कामगिरीवरच निर्णय घेईल, असा विश्वास भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, शिंदेसेनेवर घरातील मंडळींच्या पुनर्वसनासाठी युती तोडल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. येत्या काळात या आरोप-प्रत्यारोपांचा थेट परिणाम निवडणुकीच्या रणधुमाळीत दिसून येणार असून, छत्रपती संभाजीनगरचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.
